सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर शारीरिक आजार बरे होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. औषधोपचार करूनही न्यून न होणारा ‘डेंग्यू’चा ताप सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर उतरणे

‘१६.८.२०२१ या दिवशी आधुनिक वैद्यांकडे जाऊन तपासणी केल्यावर मला ‘डेंग्यू’ झाला असल्याचे निदान झाले. त्यानंतर माझे औषधोपचार चालू झाले. मला ३ दिवस साधारण १०३ अंश फॅरनहाईट ताप येत होता. माझ्यावर औषधोपचारांचा विशेष परिणाम होत नव्हता. दिवसातून ३ – ४ वेळा साधारण एक घंटा कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यावर माझा ताप न्यून होत असे. त्यानंतर मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी कळवले. त्यांनी मला ताप न्यून होण्यासाठी आणि ‘डेंग्यू’ बरा होण्यासाठी नामजपादी उपाय करायला सांगितले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर माझा ताप उतरला.

श्री. अमित विजय डगवार

२. रक्तातील ‘प्लेटलेट्स’ची संख्या न्यून होणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ती झपाट्याने वाढणे

त्यानंतर माझ्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ची संख्या न्यून, म्हणजे ५० सहस्र इतकी झाली. (‘सर्वसाधारणपणे मनुष्याच्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ची संख्या १ लाख ५० सहस्र ते ४ लाख ५० सहस्र प्रति मायक्रोलिटर असणे आवश्यक असते.’ – संकलक) आधुनिक वैद्यांनी मला तातडीने रुग्णालयात भरती करुन उपचार चालू केले. त्यानंतर याविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना नामजपादी उपाय विचारून ते केल्यावर माझ्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ची संख्या झपाट्याने वाढून १ लाख ८० सहस्र इतकी झाली.

वरील अनुभूतींमुळे नामजपादी उपायांचे महत्त्व माझ्या लक्षात आले. मला संतांची संकल्पशक्ती अनुभवायला मिळाली, तसेच ‘आधुनिक विज्ञानापेक्षा अध्यात्मशास्त्र सर्वश्रेष्ठ आहे’, याची प्रचीती आली.

‘भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या कृपाशीर्वादामुळे मी या आजारातून बरा झालो’, यासाठी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अमित विजय डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०२१)


तंत्रज्ञ साधकांनी साहाय्य केल्यावरही माझ्या भ्रमणसंगणकाची अडचण न सुटणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या केवळ अस्तित्वाने ती अडचण सुटणे

‘एकदा मी भ्रमणसंगणकावर (लॅपटॉप वर) संकेतस्थळाविषयीची सेवा करत होतो. सेवा करत असतांना मला ‘इंटरनेट’ आणि ‘नेटवर्क’ यांची अडचण येत होती. याविषयी मी संगणकांची दुरुस्ती करणार्‍या साधकाचे साहाय्य घेतले. तंत्रज्ञ साधकाने मला तांत्रिकदृष्ट्या ‘नेटवर्क’ आणि ‘इंटरनेट’ यांना अडचण नसल्याचे अन् भ्रमणसंगणकातील ‘सेटिंग्ज’ही योग्य असल्याचे सांगितले, तरीही माझ्या सेवेतील अडचण सुटत नव्हती. मी सेवा करत असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ तेथे आले. त्यांची सेवा झाल्यानंतर ते तेथून निघून गेले. सद्गुरु काका तेथून गेल्यानंतर सेवेत येणारी ‘नेटवर्क’ आणि ‘इंटरनेट’ यांची अडचण आपोआप सुटल्याचे माझ्या लक्षात आले.

यावरून ‘ईश्वर संतांच्या माध्यमातून साहाय्य करतो’, हे माझ्या लक्षात आले, तसेच  ‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे’, याची अनुभूती मला घेता आली. ‘अध्यात्मशास्त्र बुद्धीच्या पलीकडचे आहे’, हे सांगणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अमित विजय डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (३.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक