बैलगाडा शर्यतीला अनुमती मिळाल्यावर सातारा येथे शेतकर्‍यांचा आनंदोत्सव !

सातारा, १७ डिसेंबर (वार्ता.) – गत ७ वर्षांपासून बैलगाडा शर्यतींसाठी शेतकरी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. सर्वाेच्च न्यायालयाने काही नियम आणि अटी यांना अधिन राहून बैलगाडा शर्यतींना अनुमती दिली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

येथील शिवतीर्थावर (पोवईनाका) बैलांची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी शहरातील गोडोली भागातील शेतकरी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सातारावासियांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा, माणगंगा नदीकाठावरील शेतकरी जातीवंत बैलांचे प्रजनन आणि संगोपन पूर्वीप्रमाणेच करतील, अशी आशा प्राणीविशेषज्ञ व्यक्त करत आहेत.