भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, ही ऐतिहासिक चूक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

ही चूक आता भारताने सुधारली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली – वर्ष १९७१ चे युद्ध आपल्याला हेच सांगते की, भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, ही ऐतिहासिक चूक होती. पाकिस्तानचा जन्म एका धर्माच्या नावावर झाला; पण तो एकसंध राहू शकला नाही, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. सशस्त्र दलांच्या योगदानाचे स्मरण करणार्‍या ‘स्वर्णिम विजय पर्वा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की,

१. भारतीय सैन्याने वर्ष १९७१ मध्ये पाकच्या भारतविरोधी कारवाया हाणून पाडल्या होत्या आणि आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी काम केले होते. तेव्हापासून अजूनही भारत पाकिस्तानच्या कुरापती रोखण्यासाठी काम करत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आपला विजय झाला होता आणि या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आपलाच असेल.

२. इतिहासात हे क्वचित्च पहायला मिळेत की, एखाद्या देशाला युद्धात पराभूत केल्यानंतर दुसरा देश त्याचे वर्चस्व लादत नाही, तर आपल्या राजकीय प्रतिनिधीकडे सत्ता सोपवतो. भारताने हे केले; कारण तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. (वर्ष १९७१ निर्माण झालेला बांगलादेश दुसरा देश नव्हता, तर तो काही वर्षांपूर्वीच वेगळा करण्यात आलेला भारताचा भाग होता. तो वेगळा झाल्यावर स्वतंत्र राहू शकत नव्हता, त्यामुळे भारताने तो पुन्हा भारतात सहभागी करून घ्यायला हवा होता, हे संरक्षणदृष्ट्या योग्य ठरले असते ! – संपादक)