षड्रिपूंना दूर करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून आनंद प्राप्ती करणे शक्य ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमधील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा पार पडला !

पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी – आपण विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली आहे; परंतु आपल्या जीवनामध्ये लहानसा कठीण प्रसंग आला, तरी आपण पराभव मान्य करतो. जीवनात साधना आणि ईश्वराप्रती अखंड श्रद्धा यांच्या बळावर आपले कसे रक्षण होते, हे पांडवांच्या आयुष्यातील सर्व कठीण प्रसंगांवरून आपल्या लक्षात येते. धर्माच्या मार्गावर चालत असतांना ईश्वर आपले रक्षण करत असतो. त्यामुळे आपण निश्चिंत होऊन आपली साधना चालू ठेवली पाहिजे. सनातन संस्थेच्या वतीने शिकवण्यात येणारी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ही पैसे मिळवण्यासाठी चालवण्यात येणार्‍या व्यक्तीमत्त्व विकास वर्गांच्या तुलनेत अधिक योग्य अन् प्रगत आहे. त्याद्वारे आपण षड्रिपूंना दूर करून जीवनाचा खरा उद्देश समजून घेऊन आनंदप्राप्ती करू शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. गेल्या ४ मासांपासून सनातन संस्थेशी जोडलेल्या जिज्ञासूंसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा  उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमधून १०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झारखंडच्या कु. एकता राम यांनी केले.

या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे कार्य, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी जिज्ञासूंना अवगत करण्यात आले. या प्रसंगी काही जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.

पू. नीलेश सिंगबाळ पुढे म्हणाले की,

१. अध्यात्म एक परिपूर्ण शास्त्र आहे. खरे पहाता अध्यात्म आणि विज्ञान वेगळे नाही. विज्ञान अध्यात्माचेच एक अंग आहे. अध्यात्माच्या परिपूर्णतेच्या पुढे विज्ञान अतिशय थिटे आहे.

२. आपण योग्य प्रकारे साधना चालू ठेवली, तर आपली निश्चितच जलद आध्यात्मिक उन्नती होईल.