संप मागे घ्या, अन्यथा ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई करणार ! – अनिल परब, परिवहनमंत्री

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या काही कर्मचार्‍यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप चालू ठेवणे, हे कुणाच्याही हिताचे नाही. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ संप मागे न घेतल्यास ‘मेस्मा’ (अत्यावश्यक सेवा कायदा) कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, अशी चेतावणी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच ‘संपात ज्या कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे, त्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘महामंडळाच्या कर्मचार्‍यांना वेतनात ४१ टक्के वाढ देण्यात आली असून विलिनीकरणाच्या प्रश्नासाठी समिती नेमण्यात आली आहे. प्रति मासाच्या १० दिनांकापूर्वी कर्मचार्‍यांना वेतन देण्याची हमी सरकारने घेतली असतांना यापुढे हा संप चालू रहाणे योग्य नाही’, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.