५० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहूनही ‘मराठी’ न येणार्‍या गीतकार जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ?

  • हिंदु जनजागृती समितीचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रश्‍न !

  • साहित्य संमेलनात अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित करण्याची मागणी

मुंबई – मराठी भाषेसाठी कवडीचेही योगदान नसणार्‍यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वर्णी लागत असल्याने मराठीजनांचा अपेक्षाभंग होत आहे. मराठीजनांच्या विरोधानंतरही हिंदी आणि उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे, म्हणजे मराठीजनांचा अपमानच आहे. जावेद अख्तर हे अर्ध्या शतकाहून अधिक काळ महाराष्ट्र राज्यात अर्थात् मराठी भूमीत रहात आहेत; मात्र एवढ्या वर्षांत त्यांनी मराठीच्या हितासाठी कधीही काम केलेले नाही. ते स्वतःही इतक्या वर्षांत मराठी भाषा न शिकता उर्दू-हिंंदी भाषेतूनच काम करत आहेत. ज्या व्यक्तीला मराठी भाषेचे कुठल्याही प्रकारचे प्रेम नाही आणि मराठी साहित्यात तिचे कोणतेही योगदान नाही, अशांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित करणे अयोग्य आहे. एकीकडे मराठी साहित्यात भरीव योगदान देणारे आणि भाषाशुद्धीची चळवळ राबवून मराठीला समृद्ध करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा करण्यात येते, तर दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार असलेले जावेद अख्तर यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. हा एकप्रकारे मराठी भाषेचा अवमानच आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण्यात आली. याविषयी समितीने मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, तसेच आयोजक यांच्या नावे नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही दिले आहे.

(प्रसिद्धीपत्रक वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

‘हिंदु तालिबान्यां’च्या व्यासपिठावर जावेद अख्तर बसतील का ?

काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी हिंदु राष्ट्राचे समर्थन करणार्‍यांची तुलना क्रूर आणि अत्याचारी तालिबान्यांशी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेच्या मुखपत्रातून त्वरित निषेधही करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्ष २०१५ च्या दसरा मेळाव्यात जनतेला संबोधित करतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली होती, तसेच या हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १९३८ मध्ये मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अशा स्थितीत जावेद अख्तर ज्या हिंदु राष्ट्रवाद्यांना ‘तालिबानी’ असे संबोधतात, त्यांच्या व्यासपिठावर जावेद अख्तर बसणार आहेत का ?, असाही प्रश्‍न या प्रसिद्धीपत्रकात उपस्थित करण्यात आला आहे.