हिंदूसंघटन हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय ! – वक्त्यांचा सूर

  • ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ याच्या वतीने गंगावती (कर्नाटक) येथे एकदिवसीय हिंदू अधिवेशन

  • ‘हिंदु राष्ट्र निर्माण संघा’ची स्थापनेसाठी आवाहन

हिंदू अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करतांना १. पू. श्री सिद्धलिंग स्वामीजी, समवेत २. श्री. श्रवणकुमार रायकर, ३. पू. श्री परमात्मा, ४. श्री. रमेश शिंदे, ५. श्री. गूळीहट्टी शेखर, ६. श्री. प्रमोद मुतालिक

गंगावती (कर्नाटक) – भारतात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी न्यायव्यवस्था, माहिती अधिकार, आरोग्य आदींच्या माध्यमातून हिंदूंना साहाय्य करणे आणि सर्व हिंदूंचे संघटन करणे या उद्देशाने ३१ ऑक्टोबर या दिवशी कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ संघटनेचे राज्यसंचालक श्री. श्रवणकुमार यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ यशस्वीरित्या पार पडले.

या अधिवेशनात आंदोलाचे पू. श्री सिद्धलिंग स्वामीजी, कलबुर्गी येथील पू. श्री हालप्पज्ज हडगली, धारवाड येथील अवधूत पू. श्री परमात्मा, तसेच हावेरीचे प.पू. श्री प्रमोदेंद्र सरस्वती स्वामीजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

या अधिवेशनाचे मुख्य अतिथी म्हणून श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, प्रसिद्ध वक्ता कु. चैत्रा कुंदापूर, श्री. श्रवणकुमार रायकर आणि भाजपचे आमदार श्री. गूळीहट्टी शेखर उपस्थित होते. या अधिवेशनात ३० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख सहभागी झाले होते. या वेळी ‘कर्नाटक राज्यात हिंदु संघटनांना संघटित करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र निर्माण संघा’ची स्थापना झाली पाहिजे’, असे आवाहन करण्यात आले.

अधिवेशनात भाजपचे आमदार श्री. गूळीहट्टी शेखर म्हणाले की, धर्मांतराच्या संकटाने भयानक रूप धारण केले आहे. हे रोखण्यासाठी सर्व स्वामीजींनी मोठ्या प्रमाणात संघटित होणे आवश्यक आहे.

श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, सर्व हिंदु संघटनांनी संघटित होणे आवश्यक आहे. आणखी अनेक समस्या आहेत. आपण सर्व हिंदु संघटना संघटित झालो, तर अनेक समस्या दूर करू शकतो.

आपण राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘हिंदू धर्मांतर, लव्ह जिहाद आदी विविध समस्यांना सामोरे जात आहेत. या सर्वांवर असलेला एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! हिंदु राष्ट्र हे नवीन नाही. आपण राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो. सध्या ‘हलाल जिहाद’चे षड्यंत्र आणि त्यामुळे होत असलेली हानी यांविषयी आपण जागृत झाले पाहिजे. यावर्षी ‘हलाल’मुक्त दिवाळी साजरी करावी.’’

अधिवेशनात पारित केलेले महत्त्वाचे ठराव

१. भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावे.

२. काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन शीघ्रतेने करावे.

३. धर्मांतरविरोधी आणि जनसंख्या नियंत्रण कायदे लागू करावेत.

४. इतिहासाचे विकृतीकरण सुधारावे.

५. हिंदूंची देवस्थाने सरकारीकरणापासून मुक्त करावीत.

सर्वांनी संघटितपणे या ठरावांना अनुमोदन दिले.