श्री चिंतेश्वर परिवाराच्या वतीने विश्व हिंदू परिषदेचा वर्धापनदिन साजरा !

श्री सरस्वतीदेवीच्या प्रतिमेचे पूजन

गेवराई (जिल्हा बीड) – श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहुर्तावर म्हणजेच २९ ऑगस्ट १९६४ या दिवशी विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने २९ ऑगस्ट या दिवशी विश्व हिंदू परिषदेचा वर्धापनदिन श्री चिंतेश्वर परिवाराच्या वतीने गेवराई शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे धर्माचार्य प्रांत संपर्क प्रमुख, वरददत्त संस्थानचे मठाधिपती, श्री चिंतेश्वर संकुलाचे कार्यवाह श्री. नितीन डोळे, देवगिरी प्रांताच्या मातृशक्ती प्रांत संयोजिका सौ. कुंदाताई अंदुरे, बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक श्री. चंद्रकांत घोलप, श्री. चिंतेश्वर संस्कार केंद्र प्रमुख सुषमाताई मोरगांवकर, सारीका कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री सरस्वतीदेवी आणि श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सारीका कुलकर्णी यांच्या ‘निर्माणोंके पावन युग में…..’ या सुरेल पद्य गायनाने वातावरण हिंदुमय झाले होते, तर श्री. नितीन डोळे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल जवकर यांनी, तर ऋणनिर्देशन श्री. समीर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

विशेष

या वेळी श्री. चंद्रकांत घोलप यांनी ‘लव्ह-जिहाद’ आणि त्याविषयीच्या सत्यघटना अनेक उदाहरणांसह स्पष्ट करून धर्मासमोरील आव्हानांविषयी उपस्थितांना ज्ञात केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवती आणि महिला यांना ‘लव्ह जिहाद’चे ३० ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आले.