गरिबांचे दाखले, शेतकर्‍यांचे उतारे वेळेत द्या आणि नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नका ! – राजू यादव, शिवसेना

नूतन तलाठी शामराव कांबळे (डावीकडून पाचवे) यांच्याशी संवाद साधतांना राजू यादव (डावीकडून चौथे)

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), १५ जुलै (वार्ता.) – गरिबांचे दाखले, शेतकर्‍यांचे उतारे वेळेत द्या आणि नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नका. नागरिकांच्या कार्यालयीन नोंदी वेळेत करा आणि त्यांना हेलपाटे मारायला लावून त्रास देऊ नका, अशा सूचना शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख राजू यादव यांनी नूतन तलाठी शामराव कांबळे यांना दिल्या. उंचगावचे नूतन तलाठी म्हणून शामराव कांबळे हे रूजू झाले. त्या वेळी शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्या वेळी राजू यादव बोलत होते.

यापूर्वीचे तलाठी यांच्या संदर्भात शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी केलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे स्थानांतर करण्यात आले. नूतन तलाठ्यांनी जुन्या कारभाराची पुनरावृत्ती करू नये. शिवसेना जसे चांगल्या कामाचे कौतुक करते, तसे नागरिकांना त्रास दिल्यास धडाही शिकवते, अशी चेतावणी राजू यादव यांनी या वेळी दिली. या वेळी दीपक रेडकर, महादेव चव्हाण, विनायक जाधव, संतोष चौगुले, विक्रम चौगुले, प्रफुल्ल घोरपडे, विराग करी यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.