हिंदु राष्ट्राच्या संदर्भातील (कु)शंकांचे निरसन !

‘हिंदु राष्ट्र म्हणजे धर्मांधता’, असा अपप्रचार सध्या हेतूपूर्वक केला जात आहे. ‘हिंदु राष्ट्राविषयी बोलणारे म्हणजे मूलतत्त्ववादी किंवा जातीयवादी’ असे त्यांना हिणवले जाते.  धर्मनिरपेक्षतेमुळे देशासमोर असंख्य समस्या निर्माण झालेल्या असूनही धर्मनिरपेक्षतेविषयी (अंध)श्रद्धा बाळगणार्‍यांना भारत हे ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ म्हणूनच हवे आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय त्यांच्या खिजगणतीतही नाही. ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारला, तरी तथाकथित पत्रकार, निधर्मीवादी, अन्य पंथीय, काँग्रेसवाले इत्यादी मंडळी ‘हिंदु राष्ट्राची मागणी घटनाबाह्य आहे’, असा थयथयाट करतात !

बहुतेकांना ‘हिंदु राष्ट्र म्हणजे एखादा पक्ष आणणार आहे किंवा हिंदु राष्ट्र म्हणजे तिथे केवळ हिंदु रहातील, मग तेथे अन्य पंथियांचे कसे होणार ?’, असे अनावश्यक वाटत रहातेे. त्यामुळे अपसमजातून किंवा खोचकपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी शंका आणि प्रश्‍न उपस्थित केले जातात. त्यांना वैचारिक स्तरावर उत्तर देणे, हे हिंदुत्वनिष्ठांचे कर्तव्य आहे. त्यातील काही प्रश्‍न खरोखरच जिज्ञासेने विचारलेले असतात, तर काही केवळ विरोधासाठी म्हणून विचारलेले असतात. हिंदु राष्ट्राविषयी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिल्याने जिज्ञासू आणि हिंदू यांचे प्रबोधन होते अन् हिंदु राष्ट्राचा विचार एक पाऊल पुढे जातो; म्हणूनच प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने इतरांच्या मनातील हिंदु राष्ट्राविषयीचे अपसमज दूर करावेत !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र स्थापणे घटनेच्या विरोधात आहे !’

स्वातंत्र्याच्या वेळी निसर्गतः भारत हे हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे होते; कारण पाकिस्तान हे मुसलमानांचे राष्ट्र म्हणून घोषित झाले. त्यामुळे उरलेले राष्ट्र अर्थातच हिंदूंचे होते. असे असतांना हिंदूंनी त्यांच्या राष्ट्राची नैसर्गिक मागणी करणे, हा गुन्हा कसा असू शकेल ? हिंदु राष्ट्राची मागणी हा आपला नैतिक, न्यायिक, लोकतांत्रिक, राष्ट्रीय आणि धार्मिक अधिकार आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !

राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द घालता येऊ शकतो, तसा काढताही येऊ शकतो. घटनानिर्मितीच्या वेळी तो नव्हता. १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी तो घातला. जसा ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द घातला, तसा ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही घालता येऊ शकतो. ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाचा अर्थ ‘पंथनिरपेक्षता’ असा आहे; धर्मनिरपेक्षता असा नाही. धर्म ही संकल्पना वैश्‍विक आहे; संकुचित नाही.

हिंदूंचे संघटन म्हटले की, त्याविरोधात काहीतरी भीतीदायक चित्र निर्माण केले जाते, जणू निधर्मीपणा म्हणजेच कथितरित्या मुसलमान धोक्यात असल्याचे चित्र निर्माण केले जाते !

सर्वच संघटित असतांना हिंदूंचे संघटन केल्यास भीती वाटण्याचे कारण काय ? भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदूंवर अनन्वित अत्याचार होऊनही इतकी वर्षे मुसलमान येथे सुखाने नांदत आहेत. हे भारतातील हिंदु संस्कृती आणि हिंदूंची सहिष्णुता यांच्या श्रेष्ठत्वाचे उदाहरण आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंचे हाल होत आहेत. त्या तुलनेत भारतात अल्पसंख्य असलेले त्यांची लोकसंख्या वाढवून बहुसंख्य होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रात मुसलमानांचे काय होणार ?’

छत्रपती शिवरायांच्या राज्यात अन्य पंथीय होते; परंतु त्यांचे हिंदूंवर अन्याय करण्याचे किंवा हिंदूंकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य नव्हते आणि तशी आगळीक झालीच, तर त्यांना कठोर शासन केले जायचेे. त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्रातही मुसलमान असतील; परंतु ते मुख्य प्रवाहाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतील. आजप्रमाणे सातत्याने हिंदूंवरील आक्रमणे, दंगली, लव्ह जिहाद आदी प्रकारांना तिथे स्थान नसेल !

आतापर्यंत पारसी, ज्यू आदी भारतात सुखनैव नांदून भारताशी एकरूप झाले. मक्का-मदिना येथील मौलवी सांगतात, ‘‘सर्वाधिक सुखी मुसलमान हे भारतात आहेत !’’

(संदर्भ : हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ)