देहलीतील ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान’ रुग्णालयात आयुर्वेदीय औषधामुळे बरे झाले ६०० रुग्ण !

एकाचाही मृत्यू नाही आणि कर्मचार्‍यांनाही कोरोनाचा संसर्ग नाही !

आयुर्वेदावर प्रश्‍न उपस्थित करणारे आणि त्याला कमी लेखणारे याविषयी बोलतील का ?

नवी देहली – येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद – एआयआयए) या रुग्णालयामध्ये आतापर्यंत ६०० कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे एकूण रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. भरती झालेल्या ९४ टक्के रुग्णांवर आयुर्वेदीय उपचार करण्यात आले. यात आयुर्वेद औषधे, प्राणायाम आणि योगासने यांचा समावेश होता. उर्वरित ६ टक्के रुग्ण अ‍ॅलोपॅथी औषधांमुळे बरे झाले. एका रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर झाल्याने त्याला अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला. एआयआयए रुग्णालयातील एकाही कर्मचार्‍याला किंवा डॉक्टरांना उपचार करतांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या संचालक डॉ. तनुजा नेसारी यांनी सांगितले की, आमच्याकड अ‍ॅलोपॅथी डॉक्टरही आहेत. येथील कर्मचारी आणि डॉक्टरही योगासने अन् प्राणायाम करतात. तसेच सकाळी यज्ञ आणि हवन केले जाते. गुळवेल, आयुष ६४, आयुष काढा, अश्‍वगंधा आदी आयुर्वेदीय औषधे रुग्णांना दिली जातात.