योग्य साधना नियमित केल्याने आपत्काळात दैवी साहाय्याने आपले रक्षण होईल ! – शॉन क्लार्क

अध्यात्माविषयी नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय​

नवी देहली येथील ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘हवामानातील पालट’ या विषयावर आध्यात्मिक संशोधन सादर !

श्री. शॉन क्लार्क

नवी देहली – अत्यंत प्रतिकूल हवामानाशी निगडित घटना आणि नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हवामानातील अनिष्ट पालटाच्या मागे मानवाचा हात आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे; मात्र मानवाने योग्य साधनेला आरंभ केला आणि ती नियमित ठेवून वाढवत नेली, तर स्वतःमध्ये, तसेच स्वतः भोवती सात्त्विकता निर्माण होते. त्यामुळे वातावरणात जरी अनिष्ट पालट झाले, तरी साधना करणार्‍यांना आगामी आपत्काळात दैवी साहाय्य लाभून त्यांचे रक्षण होऊ शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी शोधनिबंधाच्या सादरीकरणाच्या वेळी केले. त्यांनी नवी देहली येथे ‘ऑनलाईन’ झालेल्या ‘सस्टेनॅब्लिटी स्पिरिच्युलिटी सिप्म्लिसिटी : द ३ एस् इंटरनॅशनल कॉन्फरन्स (इस्कॉन) या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘अध्यात्माच्या आधारे हवामानातील पालट सीमित ठेवणे’, हा शोधनिबंध सादर केला. ‘इस्कॉन रिसर्च विंग (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युलीटी (ISS))’ हे या परिषदेचे आयोजक होते. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर श्री. शॉन क्लार्क सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की,

१. कोणत्याही घटनेच्या मूलभूत कारणमीमांसेसह आध्यात्मिक स्तरावरही अभ्यास होणे आवश्यक असते. जेव्हा हवामानात स्वाभाविक अपेक्षेच्या विपरित विवित्र पालट होतांना आढळतात, तेव्हा त्याच्या मागे निश्‍चितपणे आध्यात्मिक कारण असते.

२. पृथ्वीवरील तामसिकता वाढली की, मानवाची अधोगती होऊन पृथ्वीतलावरील साधना करणार्‍यांची एकूण संख्या न्यून होते. मानवातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण वाढून त्याचे पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. थोडक्यात अधर्मात वाढ होते.

३. सूक्ष्मातील शक्तीमान अनिष्ट शक्ती पर्यावरणातील या र्‍हासाचा अपलाभ घेऊन तमोगुण वाढवतात, तसेच मानवावर प्रतिकूल परिणाम करतात. ज्याप्रमाणे धूळ आणि धूर यांनी स्थूल स्तरावर प्रदूषण होते अन् म्हणून आपण प्रतिदिन स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे अधर्माचरणामुळे होणारी रज-तमातील वाढ हे सूक्ष्म स्तरावरील प्रदूषण होय. निसर्ग वातावरणातील या सूक्ष्म रज-तमाची स्वच्छता नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून करतो. या प्रक्रियेची सविस्तर माहिती ‘चरक संहिते’मध्ये दिली आहे.

४. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने जगभरातील ३२ देशांतील अनुमाने १ सहस्र मातीच्या नमुन्यांतील सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास केला.

५. या अभ्यासात ८० टक्के नमुन्यांमध्ये त्रासदायक स्पंदने असल्याचे दिसून आले. यातील मातीचे काही नमुने आम्ही त्याच जागेतून वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये घेतले होते. वैज्ञानिक उपकरणाने केलेल्या चाचणीत केवळ एक वर्षाच्या कालावधीत या नमुन्यांमधील नकारात्मक ऊर्जेमध्ये १०० ते ५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळले. सारांशाने सांगायचे झाल्यास जगभरात (काही धार्मिक स्थानांतही) नकारात्मकतेमध्ये पुष्कळ वाढ झाल्याचे आढळले.

हवामानात सकारात्मक पालट आणि त्याचे रक्षण यांसाठी आध्यात्मिक स्तरावर उपाययोजना आवश्यक ! – शॉन क्लार्क

या समस्येचे मूलभूत कारण आध्यात्मिक असल्याने हवामानातील सकारात्मक पालट आणि त्याचे रक्षण यांसाठीची उपाययोजनाही मूलतः आध्यात्मिक स्तरावर असणे आवश्यक आहे. संपूर्ण समाज योग्य साधना करू लागला, तर हवामानातील हानीकारक पालट आणि तिसरे महायुद्ध यांमुळे येऊ घातलेल्या भीषण संकटांचा सामना करता येईल. असे असले तरी प्रत्यक्षात आपण केवळ स्वतःलाच साहाय्य करू शकतो. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे साधनेला आरंभ करणे किंवा चालू असल्यास ती वाढवत नेणे. कालमहिम्यानुसार सध्याच्या काळासाठी नामजप हा सोपा आणि प्रभावी उपाय आहे. सध्याच्या काळासाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा आध्यात्मिकदृष्ट्या सर्वांत उपयुक्त नामजप आहे, असे संतांनी सांगितले आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदेत सादर केलेला ७० वा शोधनिबंध होता. यापूर्वी विश्‍वविद्यालयाने १५ राष्ट्रीय आणि ५४ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्‍वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


विशेष

या कार्यक्रमाचे फेसबूकद्वारे थेट प्रसारण करण्यात आले. हा कार्यक्रम ३ सहस्र ३०० जणांनी पाहिला.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक