ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ‘ब्रह्ममुहूर्त’ असा शब्द नसून ‘ब्राह्ममुहूर्त’ असा योग्य शब्द आहे. ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या काळात अनेक गोष्टी अशा घडत असतात की, ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

ब्राह्ममुहूर्त

१. प्राणवायू मोठ्या प्रमाणात मिळणे

या काळात ‘ओझोन’ हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वांत खालच्या थरात अधिक प्रमाणात आलेला असतो. या ‘ओझोन’मध्ये मानवास श्‍वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (ऑक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्‍वसन केले असता रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.

२. या काळात मंद प्रकाश असतो. डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला, तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहिले, तर डोळ्यांचे विकार जडतात आणि दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये, यासाठी तारका असेपर्यंत उठावे.

३. अपानवायूचे कार्य सुलभतेने होणे

या काळात पंचतत्त्वांपैकी वायूतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते आणि मानवी शरिरातील अपानवायू हा कार्यरत असतो. अपानवायू मलनिःसारण आणि शरीरशुद्धीचे कार्य करतो. हा वायू कार्यरत असतांना मल बाहेर टाकण्याचे कार्य सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते.  मूळव्याध होऊ नये आणि उत्तम शरीरशुद्धी व्हावी, यासाठी याच काळात मलनिःसारण करावे, तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यामध्ये ऊर्जा कार्यरत असते.

४. ब्राह्ममुहूर्तावर शरिराबाहेर नवद्वारांद्वारे घाण काढून टाकण्याचे महत्त्व

आपल्या शरिरात दिवसभरात जमा झालेली घाण ९ ठिकाणांहून बाहेर पडत असते. २ डोळे, २ नाकपुड्या, २ कान, १ तोंड, १ मूत्रद्वार आणि १ गुदद्वार अशा या ९ ठिकाणांना नवद्वार म्हणतात. या ९ ठिकाणी रात्री शरिरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू आणि विषाणू असतात, जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू आणि विषाणू यांना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि आपण रोगास बळी पडू शकतो. हे होऊ नये, यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरिराबाहेर काढून टाकली पाहिजे.

५. ब्राह्ममुहूर्तावर स्नान करण्याचे महत्त्व

सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले, तरी आपण एकदम उत्साही रहातो.

६.या काळात ॐकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्तीसह इतर शक्ती केंद्रे जागृत असतात. या वेळी विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा अधिक काळ स्मरणात रहाते.

७. ब्राह्ममुहूर्तावर शरीरशुद्धी करण्याची आवश्यकता

सूर्योदयाच्या वेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. आपल्या त्वचेची रंध्रे मोकळी असतील, तर त्या शोषल्या जातात. त्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून शरीरशुद्धी केली पाहिजे.

८. साधना केल्यास सप्तचक्रे जागृत होणे

या काळात आपण ॐ मंत्रजप साधना केल्यास सप्तचक्रे जागृत होतात; कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने अधिक प्रमाणात कंपने निर्माण होऊन यांद्वारे कुंडलिनी जागृती होते.

९. या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे आणि सिद्धात्मे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात. या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटून उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो. असे ९ लाभ आपण ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो.

(संदर्भ : व्हॉट्सअ‍ॅप)