स्वतःभोवती निर्माण होणारे त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होण्यासाठी प्रतिदिन दृष्ट काढा !

दृष्ट काढण्यासंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सनातनचे साधक समष्टी साधना करून ‘ईश्‍वरी राज्य’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर वाईट शक्ती ‘आसुरी राज्य’ स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे वाईट शक्ती साधकांना विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर त्रास देतात. वाईट शक्तींचा त्रास हाही दृष्ट लागण्याचाच एक प्रकार होय. वाईट शक्तींच्या त्रासांमुळे साधकांना विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागते. गत २० वर्षांपासून चालू असलेला हा देवासुर लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. त्यामुळे साधकांना होणार्‍या त्रासांत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे. साधकांना होणारे त्रास न्यून व्हावे, यासाठी त्यांची मीठ-मोहरीने दृष्ट काढण्यात आली. ‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेल्या साधिकेची १.८.२०२० या दिवशी एकूण ३ वेळा मीठ-मोहरीने दृष्ट काढण्यात आली. तिसर्‍यांदा दृष्ट काढल्यानंतर तिच्यातील त्रासदायक स्पंदने पूर्णत: नाहीशी झाली. ‘दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती दिवस टिकतो ?’, हे अभ्यासण्यासाठी दुसर्‍या दिवसापासून (२.८.२०२० पासून) ते २३.८.२०२० पर्यंत तिची प्रतिदिन निरीक्षणे करण्यात आली. (२.८.२०२० ते २३.८.२०२० या कालावधीत साधिकेची दृष्ट काढण्यात आलेली नाही.)

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये दुसर्‍या दिवसापासून नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आणि त्यात उत्तरोत्तर वाढ होणे : साधिकेमध्ये दुसर्‍या दिवसापासून पुन्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली.

टीप – जागेअभावी पुढील सारणीत सर्व दिवसांची निरीक्षणे न देता काही निवडक दिवसांची निरीक्षणे दिलेली आहेत.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

सौ. मधुरा कर्वे

१. साधिकेची १.८.२०२० या दिवशी तिसर्‍यांदा दृष्ट काढल्यानंतर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पूर्णत: नाहीशा झाल्या आणि सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. त्यानंतर दुसर्‍या दिवसापासून (२.८.२०२० पासून) तिच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यात प्रतिदिन टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. २१.८.२०२० या दिवशी ती ८.३५ मीटर झाली.

३. तिसर्‍या दिवसापासून (३.८.२०२० पासून) तिच्यामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यात प्रतिदिन टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. २१.८.२०२० या दिवशी ती ७.५४ मीटर झाली.

थोडक्यात २१ दिवसांनी (२१.८.२०२० या दिवशी) साधिकेतील नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पहिल्या दिवशी (१.८.२०२० या दिवशी) दृष्ट काढण्यापूर्वी जेवढे होते अनुमाने तेवढे झाल्याचे आढळून आले. त्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ होत नसल्याने तिची निरीक्षणे करणे थांबवले.

२. निष्कर्ष

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेवर दृष्ट काढल्याचा परिणाम केवळ एक दिवस टिकला. दुसर्‍या दिवसापासून तिच्यामध्ये पुन्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली आणि २१ व्या दिवशी ती अधिकतम होती.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. दृष्ट काढल्याने व्यक्तीचे स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) दूर होणे : व्यक्तीला दृष्ट लागल्याने तिच्याभोवती रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) निर्माण होते. त्यामुळे तिच्या स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. ज्या वेळी व्यक्तीचा स्थूलदेह रज-तमात्मक स्पंदनांनी भारित होतो, त्या वेळी ती शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. शारीरिक व्याधींमध्ये तीव्र डोकेदुखी, कान ठणकणे, डोळे दुखणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायांना मुंग्या येणे, छातीत धडधडणे, हात-पाय गार पडून गळून जाणे इत्यादी त्रास होतात. दृष्ट काढल्याने तिच्या स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण दूर होते. यामुळे व्यक्तीला होणारा त्रास उणावतो किंवा नाहीसा होतो.

३ आ. मीठ-मोहरीने दृष्ट काढण्याचे महत्त्व : मीठ आणि मोहरी यांनी दृष्ट काढली असता स्थूलदेहावरील रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) मिठाच्या साहाय्याने खेचले जाऊन ते मोहरीमध्ये वेगवान लहरींच्या साहाय्याने घनीभूत होऊन नंतर अग्नीच्या साहाय्याने जाळून नष्ट केले जाते. त्यामुळे व्यक्तीला होणारा त्रास उणावतो किंवा नाहीसा होतो.

३ इ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये दुसर्‍या दिवसापासून नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यात उत्तरोत्तर वाढ होण्याचे कारण : साधिकेची १.८.२०२० या दिवशी तिसर्‍यांदा दृष्ट काढल्यानंतर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णत: नाहीशी झाली होती. दुसर्‍या दिवशी तिच्यामध्ये पुन्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि तिच्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. याचे कारण हे की, देवासुर लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे. त्यामुळे वाईट शक्ती अतिशय त्वेषाने साधकांवर आक्रमण करत आहेत. याचा परिणाम म्हणून साधकांवर पुन्हा पुन्हा त्रासदायक स्पंदनांचे आवरण येत असून ते प्रतिदिन वाढतच आहे. यामुळे साधकांची दृष्ट काढल्यानंतर त्यांच्या भोवतीची त्रासदायक स्पंदने पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होत असली, तरी दृष्ट काढल्याचा परिणाम त्यांच्यावर एक दिवसच टिकतो, असे चाचणीतील निरीक्षणांतून स्पष्ट होते. (असाच भाग अन्य साधकांची दृष्ट काढल्यानंतर त्यांच्या प्रतिदिन केलेल्या निरीक्षणांतूनही लक्षात आला आहे.)

३ ई. स्वतःभोवती निर्माण होणारे त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होण्यासाठी प्रतिदिन दृष्ट काढा ! : दृष्ट काढणे हा उपाय परिणामकारक आहे. सध्या साधकांना होत असलेल्या त्रासांची तीव्रता पहाता, त्यांची प्रतिदिन दृष्ट काढणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्यातील त्रासदायक स्पंदने न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांचा त्रास उणावेल. काही अपरिहार्य कारणाने एखाद्या दिवशी दृष्ट काढणे शक्य नसेल, तेव्हा किमान ‘मानस दृष्ट’ (टीप) तरी काढा.

टीप – मानस दृष्ट : नेहमीची दृष्ट काढतांना स्थुलातून कृती करायची असते, तर मानस दृष्ट या प्रकारात मनात त्या त्या कृतीचे स्मरण करायचे असते. ‘मानस दृष्ट’ संदर्भातील सविस्तर माहिती सनातनचा ग्रंथ ‘उतारा आणि मानस दृष्ट’ यामध्ये दिली आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२२.११.२०२०)

ई-मेल : [email protected]

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक