बॉलिवूडवाल्यांचे पाप !

सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीचे सूत्र उपस्थित झाले असून काही नामांकित घराण्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता त्याही पुढे जाऊन बॉलिवूडमधील कलाकारांचे पाकची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आरोप होत आहेत. भाजपचे नेते वैजयंत जय पांडा यांनी काही ट्वीट्स करून ही माहिती उघड केली आहे. वास्तविक हे आरोप काही नवीन नाहीत. दाऊद इब्राहिम याने मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर त्याचे बॉलिवूडचे काही कलाकार कसे त्याच्या पार्ट्यांना उपस्थिती लावत, त्याने आखाती देशांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये कसे सहभागी होत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसे पाहिले, तर या बातम्या पूर्वीही प्रसिद्ध झाल्या आहेत; मात्र अशा बातम्यांना काही दिवस प्रसिद्धी मिळते, त्याविषयी चर्चासत्रे आयोजित केली जातात आणि नंतर मात्र वातावरण शांत होते. गेली अनेक वर्षे हे असेच चालू आहे.

आता ‘झी न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार काश्मीरमधील आतंकवादी कारवाया करण्यासाठी आर्थिक साहाय्य करणारे टोनी अशाई आणि रेहान सिद्दीकी यांचे बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान याच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमधील ‘खाना’वळींच्या कारवायांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात. प्रथम भारतातील सुरक्षायंत्रणा काय करत आहेत ? विदेशात राहून भारताच्या विरोधात सातत्याने गरळओक करणारा, पाकच्या पंतप्रधानांशी संबंध ठेवणारा आणि आतंकवाद्यांसाठी आर्थिक स्रोत असणारा टोनी अशाई याच्याशी बॉलिवूडच्या कलाकारांचे व्यावसायिक संबंध असतांना सुरक्षायंत्रणा झोपा काढत होत्या का ? एखाद्याची कुकृत्ये ठाऊक असूनही त्याला मोकाट सोडणे, यासारखा राष्ट्रघात तो कोणता ? त्यामुळे याचे उत्तर सुरक्षायंत्रणांनी द्यायला हवे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना दाऊद इब्राहिम किंवा आय.एस्.आय. आर्थिक साहाय्य करते, असे निष्पन्न झाले होते. सध्या गजाआड असलेला अबू सालेम याचेही चित्रपट कलाकारांशी संबंध होते. याविषयी इत्यंभूत माहिती समोर आली होती. बॉलिवूडमध्ये झालेला भारतविरोधी लोकांचा शिरकाव या सुरक्षायंत्रणा थांबवू का शकल्या नाहीत ? आताही शाहरूख खानची चौकशी होणार आहे का ? ‘भारतविरोधी कारवाया करणार्‍या लोकांशी संबंध का ठेवले ?’, याचा जाब शाहरूख खानला या यंत्रणा विचारणार का ? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. बॉलिवूड हा हिंदूविरोधी आणि राष्ट्रघातकी कृत्यांचा अड्डा बनला आहे. त्याचे कारण अशा घटना समोर आल्यावर आपल्या लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे अशा चित्रपट कलाकारांना भारतीय समाज डोक्यावर घेतो. ‘ब्लॅक’मध्ये तिकिटे खरेदी करून त्यांचे चित्रपट पाहिले जातात, त्यांची नक्कल करण्यात युवा पिढी स्वतःला धन्य समजते. ज्या वेळी समाज अशा कलाकारांना झिडकारेल, तेव्हाच खर्‍या अर्थाने ही मंडळी ताळ्यावर येतील. त्यामुळे बॉलिवूडच्या संदर्भात समाजाची भूमिका महत्त्वाची असेल !