सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत

सांखळी, १९ जुलै (वार्ता.) – राज्यात तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता आहे. सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे अजूनही रिक्त आहेत. स्थानिकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सांखळी येथे ‘सांखळी इंजिनीयर्स असोसिएशन’च्या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘व्यवसायात असलेल्या अभियंत्यांनी नवीन अभियंत्यांना त्या क्षेत्रात प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अभियंत्यांवर राष्ट्र घडवण्याचे दायित्व असते आणि ते गुंतागुंतीचे प्रश्न सोडवतात. अभियंता बनण्यासाठी शिक्षणावर गोव्यात पुष्कळ पैसे खर्च करावे लागत नाहीत. सरकारच्या नवीन योजनेनुसार अभियंता शिक्षणासाठीचे बहुतांश शुल्क सरकारच भरत असते. गोवा राज्य आकाराने लहान असले, तरी गोव्यात नौकाबांधणी देशात सर्वाधिक होत आहे. अभियंत्यांना मत्सोद्योग, आरोग्य, पर्यटन, अक्षय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यस्थापन आदी क्षेत्रांत पुष्कळ वाव आहे. युवकांनी सरकारी नोकरीकडे केवळ मासिक वेतन मिळणारे एक साधन म्हणून पाहू नये, तर याकडे समाज आणि पुढील पिढी घडवण्यासाठीची एक संधी म्हणून पहावे.’’