रत्नागिरी जिल्ह्यात ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ होणार

  • जिल्ह्यासाठी १०.५० कोटी रुपयांचा निधी

  • एकाच छताखाली मिळणार आयुर्वेद, होमिओपॅथी आणि अन्य उपचार

  • पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश  

रत्नागिरी – जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली आहे. जिल्ह्यासाठी ३० खाटांच्या अत्याधुनिक एकात्मिक आयुष रुग्णालयास (Integrated AYUSH Hospital) राज्यशासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी रु. १०.५० कोटी इतका निधी संमत करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी या रुग्णालयासाठी राज्यशासनाकडे सातत्याने आणि आग्रही पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातून आणि नागरिक यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

उद्यमनगर येथे उभे रहाणार रुग्णालय 

महाराष्ट्र शासनाच्या आयुष विभागाने जारी केलेल्या नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील धुळे, सातारा, वाशीम, नांदेड आणि रत्नागिरी अशा ५ जिल्ह्यांतील आयुष रुग्णालयांसाठी एकूण रु. ६६ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हे भव्य रुग्णालय रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयाजवळ, उद्यमनगर येथे उपलब्ध असलेल्या जागेत उभारण्यात येणार आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागांतील नागरिकांना या आरोग्यसेवेचा लाभ सहज घेता येणार आहे.

एकाच ठिकाणी मिळणार पुढील उपचार पद्धती

आयुर्वेद (Ayurveda), योग आणि निसर्गोपचार (Yoga & Naturopathy)

युनानी (Unani), सिद्ध (Siddha) आणि होमिओपॅथी (Homeopathy)

अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि रुग्णाभिमुख सेवांमुळे जिल्ह्यातील आयुष आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आयुष उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास साहाय्य होणार असून आरोग्य क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. – डॉ. भास्कर जगताप (जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी)