हिवाळी अधिवेशनात ‘समान नागरी कायद्या’चा मसुदा आणणार ! – CM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – नागपूर येथे येणार्‍या हिवाळी अधिवेशनामध्ये समान नागरी कायद्याचे विधेयक आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. या कायद्याचा मसुदा सिद्ध करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यघटनेमध्ये प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्ष २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या कायद्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. सर्वाेच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ७ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर्.सी. चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस्.जी. मेहेरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी.के. जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, राज्यघटनेचे अभ्यासक पद्मश्री रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुवर्णा रावल यांचा समावेश आहे, असे या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.