भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना सुनावले !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

सेंट पीटर्सबर्ग (रशिया) – भारताला रशियासमवेतचे सहकार्य अल्प करायला लावण्यासाठी भाग पाडण्याचे अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांचे प्रयत्न व्यर्थ आहेत. एवढेच नाही, तर भारतासारख्या देशावर असा दबाव आणणे, हे जागतिक स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसाठी अत्यंत घातक आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना सुनावले. ते येथे वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी बोलत होते. या वेळीत्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणि आर्थिक प्रगतीचेही कौतुक केले.

भारत अत्यंत प्रभावी गतीने प्रगती करत आहे !

राष्ट्राध्यक्ष पुतीन पुढे म्हणाले की, भारत सध्या जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असून तो अत्यंत प्रभावी गतीने प्रगती करत आहे. ही प्रगती अशीच अचानक झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलेल्या कठोर परिश्रमांचा हा परिणाम आहे. आगामी काळात रशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सचा (९ लाख ६० सहस्र कोटी रुपयांचा) टप्पा पार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अमेरिकेसमवेतचे संबंध हे रशियासमवेतच्या मैत्रीत कोणताही अडथळा आणू शकत नाहीत !

‘भारताच्या अमेरिकेसमवेतच्या वाढत्या जवळीकतेमुळे रशिया आणि भारत यांच्या संबंधांवर काही परिणाम होईल का?’, असा प्रश्न पुतिन यांना एका पत्रकाराने विचारला. यावर पुतिन म्हणाले की, भारताचे अमेरिकेसमवेतचे संबंध हे रशियासमवेतच्या मैत्रीत कोणताही अडथळा आणू शकत नाहीत. भारत हा एक महान देश आणि मोठी लोकशाही आहे. रशिया भारताला स्वतःचा एक अत्यंत विश्वासू भागीदार मानतो. भारत स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी ज्या देशांशी संबंध ठेवणे आवश्यक समजतो, त्या सर्व देशांशी तो त्याचे संबंध वाढवत आहे आणि याचा आम्हाला आनंदच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रशियासमवेतचे संबंध तोडण्यासाठी पाश्चात्त्य देशांचे प्रयत्न अपयशी !

पुतीन यांनी मान्य केले की, रशियासमवेतचे संबंध तोडण्यासाठी पाश्चात्त्य देशांकडून भारतावर सातत्याने दबाव आणण्याचे प्रयत्न झाले आहेत; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांच्यावर दबाव आणणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी किती हानीकारक ठरू शकते, हे आता सर्वांनाच समजले आहे. भारताच्या इतर देशांससमवेत असलेल्या संबंधांमुळे रशियावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, उलट रशिया भारताससमवेतचे आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक भक्कम करत राहील.

पाकिस्तान चीनच्या ‘रिमोट कंट्रोल’वर चालत नाही !

‘पाकिस्तान पूर्णपणे चीनच्या प्रभावाखाली आला आहे का?’ या प्रश्नावर पुतिन म्हणाले की, मला तसे वाटत नाही. पाकिस्तान एक मोठा देश असून त्याचे जगातील अनेक देशांशी बहुआयामी संबंध आहेत. पाकिस्तानसाठी चीनसमवेतचे सहकार्य निश्चितच महत्त्वाचे आहे; पण याचा अर्थ असा नाही की, तो केवळ चीनच्या सांगण्यावरून निर्णय घेतो.

भारत-चीन सीमावादावर रशिया हस्तक्षेप करणार नाही !

पुतिन यांनी भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर म्हटले की, रशियाला या प्रकरणात हस्तक्षेप करायचा नाही; कारण हा त्या दोन्ही देशांमधील विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सीमेसह सर्व प्रलंबित सूत्रे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आणि चीन आमचे मित्र आहेत. आमचे दोन्ही देशांशी संबंध आहेत. अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही. भारत आणि रशिया यांच्या वाढत्या भागीदारीमुळे चीनला कोणतीही अडचण नाही अन् रशिया-चीन संबंधांमुळे भारतही अस्वस्थ होत नाही. रशियाचे भारत आणि चीन या दोन्ही देशांशी असलेले संबंध नैसर्गिकरित्या विकसित झाले असून एकाशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा दुसर्‍यावर कुठलाही परिणाम होत नाही.