‘गुरुकृपायोग’ साधनामार्ग हा अभूतपूर्व अशा अमृतमंथनाप्रमाणेच आहे ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

पूर्वार्ध 

गुरुकृपायोग

१. अमृतमंथनाच्या वेळी क्षीरसागरात औषधी वनस्पती, बिया इत्यादी अर्पण करण्यात येणे

क्षिप्त्वा क्षीरोदधौ सर्वा वीरुत्तृणलतौषधीः । – श्रीमद्भागवत, स्कन्ध ८, अध्याय ६, श्लोक २२

अर्थ : क्षीरसागरामध्ये सर्व प्रकारचे गवत, वेली, औषधी वनस्पती टाकून

आधाय द्रुतमथ वासुकिं वरत्रां पाथोधौ विनिहित-सर्वबीजजाले ।। – श्रीनारायणीयम्, दशक २७, श्लोक ५

अर्थ : नंतर लगेच वासुकीला दोरी करून समुद्रात सर्व प्रकारचे बीज अर्पण करण्यात आले.

अमृत प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेल्या अमृतमंथनाच्या वेळी, म्हणजेच मंथन आरंभ करण्यापूर्वी क्षीरसागरात अनेक वनस्पती, वेली, औषधी वनस्पती, औषधी गवत आणि बिया अर्पण करण्यात आल्या होत्या.

१ अ. गुरुदेवांनी मोक्षप्राप्तीसाठी साधकांच्या मनात नामजप, सत्संग इत्यादी बिजे रुजवणे : त्याचप्रमाणे मोक्षरूपी अमृत प्राप्त करण्यासाठी मनाचे मंथन आरंभ करण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना नामजप, सत्संग आणि सत्सेवा यांसारखे सात्त्विक घटक मनात रुजवण्यासाठी दिले आहेत.

२. अहंकारामुळे ३३ कोटी देव आणि ६६ कोटी असुर उचलू न शकलेला मंदार पर्वत भगवान श्रीविष्णूने तात्काळ उचलून गरुडावर ठेवणे आणि गरुडाने तो क्षीरसागरात ठेवणे

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

दूरभारोद्वहश्रान्ताः शक्रवैरोचनादयः ।
अपारयन्तरस्तं वोढुं विवशा विजहुः पथि ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ८, अध्याय ६, श्लोक ३४

अर्थ : परंतु तो मंदार पर्वत अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जायचा होता. त्यामुळे इंद्र, बळी आदी सारे थकले. ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत.

गिरिं चारोप्य गरुडे हस्तेनैकेन लीलया ।
आरुह्य प्रययावब्धिं सुरासुरगणैर्वृतः ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ८, अध्याय ६, श्लोक ३८

अर्थ : नंतर (विष्णूने) एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव अन् असुर यांसह ते समुद्राकडे निघाले.

मंथन करण्यासाठी मंदार पर्वताला रवी म्हणून क्षीरसागरात ठेवण्यासाठी ३३ कोटी देव आणि ६६ कोटी असुर यांनी तो उचलला. तेव्हा ‘इतका मोठा पर्वत आपण उचलू शकतो’, या त्यांच्यातील अहंकारामुळे तो निसटून खाली पडला. भगवान श्रीविष्णूने तात्काळ तो पर्वत एका हाताने सहजपणे उचलला आणि स्वतःचे वाहन गरुड यावर ठेवला. गरुडाने तो पर्वत क्षीरसागरात ठेवला.

२ अ. गुरुदेवांनी साधकांच्या मनाचे मंथन होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचा पर्वत त्यांच्या मनात ठेवणे : त्याचप्रमाणे आपल्या मनाचे मंथन करून व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोष बाहेर काढण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचा आशीर्वाद दिला आहे. त्यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचा पर्वत उचलून मनाचे मंथन होण्यासाठी तो साधकांच्या मनात ठेवला आहे.

३. मंदार पर्वत धारण करण्यासाठी श्रीविष्णूने महाकाय कूर्म अवतार घेणे

मथ्यमानेऽर्णवे सोऽद्रिः अनाधारो ह्यपोऽविशत् ।
ध्रियमाणोऽपि बलिभिः गौरवात् पाण्डुनन्दन ।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ८, अध्याय ७, श्लोक ६,

अर्थ : परिक्षिता, जेव्हा समुद्रमंथन चालू झाले, तेव्हा बलवान देव आणि असुर यांनी पकडून ठेवूनही खाली आधार नसल्याने मंदराचल समुद्रात बुडू लागला.

कृत्वा वपुः कच्छपमद्भुतं महत् प्रविश्य तोयं गिरिमुज्जहार । – श्रीमद्भागवत, स्कन्ध ८, अध्याय ७, श्लोक ८

अर्थ : (भगवंताने) मोठे विस्मयकारक कूर्मरूप धारण करून समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचलाला वर उचलले.

जेव्हा देव आणि असुर यांनी मंथन करायला आरंभ केला, तेव्हा मंदार पर्वताच्या खाली आधार नसल्यामुळे स्वतःच्या वजनामुळे तो बुडू लागला. हे पाहून करुणामूर्ती भगवान विष्णूने एक लाख योजन (१ योजन म्हणजे १२ ते १४ किलोमीटर) लांबीचा महाकाय कूर्म अवतार घेतला आणि वज्राप्रमाणे कठीण असणार्‍या स्वतःच्या पाठीच्या कवचावर मंदार पर्वताचे वजन पेलले.

३ अ. गुरुदेवांनी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांच्या वजनामुळे निराश आणि हताश झालेल्या साधकांना भावजागृतीचे प्रयत्न करायला शिकवणे : त्याचप्रमाणे जेव्हा आपण स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेला आरंभ करतो, तेव्हा स्वत:च्या व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांच्या वजनामुळे साधकाला निराशा येते आणि तो हताश होतो. अशा वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला सकारात्मक विचार करून त्यातून बाहेर येण्यासाठी, तसेच स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेद्वारे मनाचे मंथन चालू ठेवण्यासाठी भावजागृतीचे प्रयत्न करायला शिकवले आहे.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या समष्टी संत), चेन्नई, तमिळनाडू. (१.२.२०२४)

(क्रमशः)

उत्तरार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1040974.html