जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

आपण जी साधना करतो तिच्यामागे स्वतःचा हेतू देवाच्या कृपेचा असतो आणि ईश्वरी कृपा ही आपल्या सेवेतून ईश्वराला समाधान झाल्यासच प्राप्त होते. आपल्या कार्याला यश येणे, दुष्कर्म करण्याच्या विचारांपासून आपले मन मागे फिरणे, आपल्या व्यवसायात यश येऊन भरपूर द्रव्य मिळणे, आपल्या कुटुंबातील सर्वांचा परस्पर प्रेमभाव असणे आणि सर्वजण निरोगी, सदाचारी असणे इत्यादी व्यावहारिक गोष्टी ईश्वरीकृपेविना यशस्वी होत नाहीत अन् ती ईश्वरीकृपा आपल्या मनातील प्रामाणिक भगवद्भक्तीविना होऊ शकत नाही. कुठेतरी लक्ष देऊन नुसतेच तोंडाने नाम घेत बसले, तर देवाला आवडत नाही. जेव्हा तुम्ही नाम घेता, तेव्हा तो तुमच्या मनासमोर असला पाहिजे आणि जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच आहे. माझ्या जीवनात अनेक तीर्थयात्रांमध्ये अनेक वेळा सहभागी होण्याची संधी मला लाभली. मी अनेक नोकर्‍या सोडल्या; पण एक सोडली, की दुसरी लगेच हाती यायची. माझ्या जीवनात अत्यंत एकरूपतेने वागणारी, कधीही कोणत्याही विषयात विरोध न करणारी आणि माझा प्रत्येक शब्द उचलून धरणारी अत्यंत सुशील पत्नी भगवंताने मला दिली. त्यामुळे जीवन आनंदमय झाले. काहीप्रसंगी साक्षात्कारही घडले. हेच ईश्वरकृपेचे मुख्य पुरावे आहेत.

– भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.