भविष्यात भारत-पाक युद्ध भडकले, तर ते अधिक भयानक असेल ! – Elizabeth Threlkeld

अमेरिकी सरकारमधील माजी मुत्सद्दी एलिझाबेथ थ्रेलकेल्ड यांचा दावा

एलिझाबेथ थ्रेलकेल्ड

न्यूयॉर्क (अमेरिका) – पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ या सैनिकी मोहिमेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने अमेरिकी सरकारमधील माजी मुत्सद्दी यांनी ‘एक्स’वर एक लेख लिहिला आहे. त्या म्हणतात की, जर पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध भडकले, तर ते पूर्वीच्या तुलनेत अधिक भयानक असेल. अमेरिकासुद्धा ते थांबवू शकणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तज्ञांना भीती वाटत होती की, भारत-पाकिस्तान यांच्यात भूमीवर लढाई चालू झाली, तर पाक अण्वस्त्रांचा वापर करू शकतो; परंतु आता येणारे संकट जाणूनबुजून चालू होणार्‍या लढाईपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते.

एलिझाबेथ थ्रेलकेल्ड यांनी मांडलेली सूत्रे !

१. पूर्वी भारत आक्रमण करील आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाक छोट्या अण्वस्त्रांच्या वापर करील, अशी जगाला भीती होती. आता मात्र उभय देशांनी ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ‘एअर डिफेन्स सिस्टम’, इलेक्ट्रॉनिक आक्रमणे आणि अचूक मारा करणारी शस्त्रास्त्रे यांवर मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे आता अण्वस्त्रांचा वापर न करताही ते लढू शकतात.

२. यामुळे आता लढाई वेगवान, सखोल आणि अनेक आघाड्यांवर होऊ शकते. यामध्ये सायबर आक्रमणे आणि पारंपारिक शस्त्रास्त्रांचा वापर होऊ शकतो.

३. एका देशाच्या एका छोट्या चुकीला दुसरा देश मोठे आक्रमण समजू शकतो. निर्णय घेण्यासाठी मिळणारा वेळही अत्यल्प असेल.

४. मागील युद्धांच्या वेळी दोन्ही देश काही काळ आक्रमणे करून त्यांचा संदेश देत असत आणि हानी नियंत्रणात ठेवत असत. तथापि पुढच्या वेळी दोन्ही देश मध्यस्थी होण्यापूर्वीच युद्धभूमीवर स्वतःचे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे परिस्थिती वेगाने हाताबाहेर जाऊ शकते.