Hindu Shaurya Puraskar 2026 : पुणे – हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्कार देऊन गौरव !

  • अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, इतिहासतज्ञ श्री. पांडुरंग बलकवडे यांच्यासह ५ जणांना पुरस्कार

  • ‘श्री रामनवमी उत्सव समिती’च्या वतीने मिरवणुकीचे आयोजन

श्रीराम पंचायतन रथ

पुणे, २७ मार्च (वार्ता.) – येथील धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष आहे. राजर्षी शाहू बँक चौक, गुलाबनगर ते धनकवडी, शेवटच्या बस स्टॉपपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यात श्री रामपंचयातन रथ आणि श्रीरामाची पालखी यांचा समावेश होता.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला.

पुरस्कार प्रदान करतांना (डावीकडून दुसरे) सर्वश्री भीमराव तापकीर, (मध्यभागी) पांडुरंग बलकवडे, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, नितीन महाजन

मिरवणुकीनंतर व्यासपिठावर ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. या वर्षी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे सदस्य, तसेच ‘अन्नामृत फाऊंडेशन पुणे’चे संचालक श्री. संजय भोसले,  ‘शनिपार मित्रमंडळा’चे अध्यक्ष श्री. समीर गायकवाड, ‘केशव शंखनाद पथका’चे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन महाजन यांचाही सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.

(डावीकडून) सर्वश्री भीमराव तापकीर, पुरस्कार मिळालेले श्री. संजय भोसले, श्री. पांडुरंग बलकवडे, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. नितीन महाजन आणि श्री. समीर गायकवाड

रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निरपराध हिंदूंच्या वतीने आम्ही न्यायालयात लढतो ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

मार्गदर्शन करतांना अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर

गेली १२ वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम करणार्‍या या मंडळाचे मी अभिनंदन करतो. रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निरपराध हिंदूंच्या वतीने आम्ही न्यायालयात लढतो. त्यांना न्याय मिळवून देणे आपले कर्तव्य आहे, तसेच आझाद मैदानात महिला पोलिसांवर झालेल्या आक्रमणाच्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही. त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. पोलीस प्रशासनाने यासाठी प्रयत्न करावेत, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

पुरस्काराचे मानकरी !

या वेळी श्री. पांडुरंग बलकवडे यांना हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील त्यांचे योगदान आणि समाजकार्य यांचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘इस्कॉन’चे उपाध्यक्ष आणि ‘अन्नामृत फाउंडेशन’चे संचालक श्री. संजय भोसले हे विविध माध्यमातून करत असलेल्या सामाजिक सेवेविषयी त्यांनाही ‘हिंदु शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

यात्रेचे मुख्य आकर्षण !

ढोलताशा पथक

शोभायात्रेमध्ये श्रीरामरथ, ‘रुद्र गर्जना ढोल-ताशा पथक’, ‘अमर ब्रँड’ पथक आणि ‘केशव शंखनाद’ या पथकाचा सहभाग होता. यासोबतच १०० ढोल-ताशांचे एकत्रित वादन, रांगोळ्यांच्या पायघड्या, आकर्षक विद्युत् रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘कोल्ड फायर शो’ हे या यात्रेचे मुख्य आकर्षण होते. या मंगलप्रसंगी सर्व रामभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ मोठया संख्येने उपस्थित होते.

आरती करतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना देण्यात आलेल्या सन्मानचिन्हावरील लिखाण खालील प्रमाणे आहे

आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे !

(चित्रावर क्लिक करा)

या आधुनिक युगामध्ये अनेक ‘समाजरत्न’ समाजासाठी अनेक प्रकारचे योगदान देऊन किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवून हिंदवी स्वराज्यासाठी मुहूर्तमेढ रोवत असतात. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली, ती रामराज्याच्या आदर्शातूनच ! शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न सुराज्यात परावर्तित करण्यासाठी लाखो वर्षांनंतरही शांत, संयमी, पराक्रमी आदर्शवंत राज्यकर्ता श्री प्रभु रामचंद्र यांची मनुष्याला भुरळ पडते. श्रीरामनवमीच्या पावन मुहूर्तावर तुम्ही या हिंदवी स्वराज्यासाठी देत असलेल्या योगदानाविषयी आपणास ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे, या शब्दांत ‘श्रीरामनवमी उत्सव समिती’ने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा गौरव केला आहे.

उपस्थिती

वैशिष्ट्यपूर्ण

संपूर्ण मिरवणुकीत आणि कार्यक्रमात भजने अन् भावपूर्ण वातावरण होते. ‘शंखनाद पथक’ आणि ढोल-ताशा पथक यांनी पारंपरिक पद्धतीने वादन करत प्रभु रामचंद्रांना वंदन केले. प्रभु रामचंद्रांची पालखी घेऊन अनवाणी पदयात्रेत सहभागी झाले होते. सर्व परिसर भगवामय झाला होता. प्रभु रामचंद्र आणि भारतमाता की जय, वन्दे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या हस्ते प्रभु श्रीरामाच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.