गोवंशियांची अवैध वाहतूक आणि गोहत्या होऊ नये यासाठी पुढील ३ दिवस दक्ष रहावे !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या निवेदनानंतर चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांचे पोलिसांना निर्देश

डावीकडून दीपक पवार, अजिंक्य ओतारी, अनुराग उतेकर, निवेदन स्वीकारतांना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, विक्रम जोशी, डॉ. हेमंत चाळके, आदित्य जोशी आणि अक्षय ओतारी

चिपळूण, १८ मार्च (वार्ता.) – रमझान ईदच्या काळात गोवंशियांची अवैध वाहतूक आणि गोहत्या होऊ नयेत यासाठी कायदेशीर अन् प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी, याविषयी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने १८ मार्च या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना निवेदन देण्यात आले. बेले यांनी या निवेदनाची तातडीने नोंद घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीसयंत्रणेला ‘पुढील ३ दिवस गोवंशियांची अवैध वाहतूक आणि गोहत्या होऊ नये, यासाठी काटेकोरपणे आणि दक्ष राहून कारवाई करण्यात यावी’, असे निर्देश दिले.

हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनाही पाठवण्यात आले आहे. नुकतेच परशुराम घाटात एक गोतस्करी करणारे वाहन रोखण्यात आले असता त्यामध्ये जिवंत असलेले गोवंश तेथेच टाकून गोतस्कर पसार झाले होते. पोलीसयंत्रणेला ते सापडले नाहीत. असे प्रकार चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारंवार होत असल्याची चर्चाही या वेळी करण्यात आली.

हे निवेदन देण्यासाठी शिवसेना गुहागर विधानसभा क्षेत्र निरीक्षक श्री. अनुराग उतेकर, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके, शिवसेना युवासेना उपतालुकाप्रमुख आदित्य जोशी, गोरक्षक विक्रम जोशी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अजिंक्य ओतारी, सूरज कदम, दीपक पवार आदी उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीने पोलिसांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे की,

भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्व आर्टिकल ४८, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, तसेच सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या प्रतिबंधक कायदे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच सामाजिक सौहार्द टिकून रहावे याकरता सणांच्या निमित्ताने गोवंशियांची अवैध वाहतूक किंवा गोहत्या करणार्‍या व्यक्ती आणि संघटना यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.