धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची आवश्यकता ! – श्रीमंत मुधोजी राजे भोसले

  • दुर्ग (छत्तीसगड) येथे २ दिवसीय अनिवासी ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’ची सांगता

  • १ सहस्राहून अधिक युवकांनी घेतला स्वसंरक्षणासह राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचा संकल्प

डावीकडून श्री निरंजन चोडणकर, श्री आशिष शर्मा, दुर्ग महापौर श्रीमती अलका बागमार, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, त्यांचा सत्कार करतांना पू. अशोक पात्रीकर, सुनील घनवट आणि कमल बिस्वाल

दुर्ग (छत्तीसगड) – जेव्हा आपल्या माता-भगिनींवर अत्याचार वाढले, आपल्या धर्मावर आक्रमण वाढले आणि आपली मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येऊ लागली, तेव्हा त्यांचा आपल्या शूर राष्ट्रीय पुरुषांनी प्रतिकार केला आणि आपल्या माता-भगिनी, मंदिरे आणि धर्म यांचे रक्षण केले. अशा वेळी सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची आवश्यकता आहे. ‘वैदिक गुरुकुल कल्याण फाऊंडेशन’ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी चालू केलेले शौर्य जागृत करण्याचे कार्य पाहून मला विश्वास आहे की, छत्रपती शिवराय आणि झाशीची राणी प्रत्येक घरात निश्चित जन्माला येतील, असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी काढले.

हिंदु जनजागृती समिती आणि ‘वैदिक गुरुकुल कल्याणकारी फाऊंडेशन’ यांनी संयुक्तपणे दुर्गमधील पुलगावच्या महेश कॉलनीमध्ये आयोजित केलेल्या २ दिवसीय अनिवासी ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त दुर्ग, राजनांदगाव, रायपूर आणि खैरागडसह अनेक जिल्ह्यांतील १ सहस्राहून अधिक युवक-युवती उत्साहात सहभागी झाले आणि स्वसंरक्षण शिकून आत्मविश्वासाने अन्यायाच्या विरोधात लढण्याचा संकल्प केला. या शिबिराला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या शिबिराला दुर्गचे पोलीस अधीक्षक श्री. विनोद अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक भारती मारकाम, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, ‘वैदिक गुरुकुल कल्याणकारी फाऊंडेशन’चे संस्थापक अधिवक्ता आशिष शर्मा, भाजपचे नेते श्री. प्रबल प्रताप जुदेव, शिक्षणमंत्री श्री. गजेंद्र यादव, दुर्गच्या महापौर अलका बागमार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचे कौतुक केले.

श्रीमंत मुधोजी राजे भोसले

या शिबिराच्या समारोपाला संबोधित करतांना श्रीमंत मुधोजी राजे पुढे म्हणाले, ‘श्रीमंत रघुजी राजे भोसले यांनी हिंदु स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्तीसगडाची स्थापना केली. आपला शौर्यपूर्ण इतिहास जाणून घेतल्यासच आपल्याला येणार्‍या काळासाठी खरी प्रेरणा मिळू शकते. आपण त्या विरांचे वंशज आहोत. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.’

तरुणांनी शौर्य जागृत करण्याची आवश्यकता ! – गजेंद्र यादव, शिक्षणमंत्री, छत्तीसगड

जिजामातेने लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना शस्त्रे आणि शास्त्रे शिकवून सक्षम केले आणि हिंदु स्वराज्याचा पाया रचला. तेच शौर्य आजच्या प्रत्येक तरुणात आहे; पण ते जागृत करण्याची आवश्यकता आहे, जे या शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे.

सनातन धर्माच्या रक्षणासाठी शास्त्रासमवेत शस्त्र शिकले पाहिजे ! – प्रबल प्रताप जुदेव, नेते, भाजप

सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी शास्त्रासमवेत शस्त्रही शिकणे आवश्यक आहे. आज सनातन धर्म धोक्यात आहे; सनातनला तरुणांची आवश्यकता आहे. येणार्‍या कठीण काळासाठी आपण शास्त्र आणि शस्त्र दोन्हीसह सिद्ध असले पाहिजे. त्याचे रक्षण करण्यासाठी युवा शक्ती जागृत होत असल्याचे पाहून आनंद होतो.

पू. अशोक पात्रीकर

धर्मरक्षणार्थ आत्मबळ वाढवण्यासाठी प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप करा ! – पू. अशोक पात्रीकर

सध्याच्या परिस्थितीत आपण अन्याय सहन करू नये, तर प्रतिकार करावा. त्यासाठी आपण साधना म्हणून बलोपासना केली पाहिजे. हिंदु धर्मानुसार महिलांमध्ये दुर्गातत्व आणि पुरुषांमध्ये शिवतत्व असते. ते आध्यात्मिक साधना करून जागृत केले पाहिजे. यासमवेतच आत्मबळ वाढवण्यासाठी प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’, असा जप करणे आवश्यक आहे.

सुनील घनवट

स्वसंरक्षण शिकून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान द्या ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक

ज्या राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांनी तरुणपणापासूनच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी बलीदान दिले, त्यांच्या शौर्याचा एक भाग आपल्यातही आहे; पण तो जागृत करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्ररक्षण करणे, हे तरुणांचे दायित्व आहे. त्यामुळे प्रथम स्वसंरक्षण शिकून नंतर राष्ट्र आणि आणि धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान द्यावे. यासमवेतच शाळा-महाविद्यालयांमधून धर्मांध आणि डाव्या विचारसरणीच्या शक्ती आपल्या तरुणांना शौर्यहिन बनवत आहेत. त्याकडे सतर्क राहून पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

प्रत्येक आठवड्याला नियमितपणे स्वसंरक्षण शिका ! – अलका बागमार, महापौर

आपण प्रत्येक आठवड्याला नियमितपणे अशा कार्यासाठी थोडा वेळ देऊन स्वसंरक्षण शिकले आणि इतरांना या कार्यात सहभागी करून घेतले, तर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणकार्यात मोठे योगदान ठरेल.

‘वैदिक गुरुकुल कल्याणकारी फाऊंडेशन’विषयी फाऊंडेशनचे संस्थापक अधिवक्ता आशिष शर्मा यांनी माहिती दिली. शिबिराची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे श्री. कमल बिस्वाल यांनी सांगितली. सूत्रसंचालन अंजली कानस्कर आणि मेघा राठी यांनी केले.

क्षणचित्रे :

१. दुर्गचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक श्री. विजय अग्रवाल आणि पोलीस उपअधीक्षक भारती मारकाम यांनी प्रशिक्षणार्थींना स्वसंरक्षणाच्या संदर्भातील कायद्यांविषयी माहिती दिली. या वेळी त्यांनी अशा शिबिरांची आवश्यकता विषद करून सांगितले की, जर तुम्ही स्वतःचे रक्षण करण्यास सिद्ध असाल, तर कायदा तुमच्या पाठीशी उभा आहे.

२. या शिबिरामध्ये मुख्य प्रशिक्षक हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर आणि सहकारी प्रशिक्षक यांनी कठीण परिस्थितीत कराटे, लाठी, नानचाकू यांच्या माध्यमातून स्वसंरक्षण कसे करावे, याविषयी उपाय शिकवले.