‘वन्दे मातरम्’ला १०० वर्षे झाली, तेव्हा आणीबाणीचा काळा अध्याय देशाने अनुभवला ! – PM Modi

‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेतील चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – ‘वन्दे मातरम्’ला जेव्हा ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा आपला देश गुलामीत जगत होता. देशात पारतंत्र्य होते. ‘वन्दे मातरम्’ला १०० वर्षे झाली, तेव्हा देश आणीबाणीचा काळा अध्याय अनुभवत होता.

भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्या वेळी झाले. देशभक्तांना गजाआड केले होते. दुर्दैवाने एक काळा कालखंड आपण त्या वेळी अनुभवला होता. ‘वन्दे मातरम्’ हे तेच गीत आहे, ज्या गीताने वर्ष १९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले. ‘वन्दे मातरम्’ला १५० वर्षे झाल्यानिमित्त ८ डिसेंबरला लोकसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी मोदी यांनी ‘वन्दे मातरम्’चे कौतुक करत काँग्रेसवर टीका केली.

नेहरूंनी मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले !

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करतांना पुढे म्हटले की,

महंमद अली जिना यांनी १५ ऑक्टोबर १९३६ या दिवशी लक्ष्मणपुरीमधून (लखनौमधून) ‘वन्दे मातरम्’च्या विरोधात घोषणा दिली. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष नेहरू यांना त्यांचे सिंहासन डळमळतांना दिसले. नेहरूंनी मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी, त्यांचा निषेध करण्याऐवजी, उलट घडले. त्यांनी ‘वन्दे मातरम्’ची चौकशी चालू केली. नेहरूंनी ५ दिवसांनंतर नेताजी बोस यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी जिनांच्या भावनांशी सहमती दर्शवत लिहिले की, ‘वन्दे मातरम्’च्या आनंदमठमधील पार्श्वभूमीमुळे मुसलमान दुखावू शकतात. मुसलमान भडकतील.’ यानंतर काँग्रेसचे निवेदन आले की, २६ ऑक्टोबर या दिवशी काँग्रेस कार्यसमितीची बैठक होईल, ज्यात ‘वन्दे मातरम्’च्या  वापराविषयी पुनरावलोकन केले जाईल. या प्रस्तावाच्या विरोधात लोकांनी देशभरात प्रभातफेर्‍या काढल्या; पण काँग्रेसने ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणे चालू ठेवले. इतिहास साक्षी आहे की, काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले. दुर्दैवाने काँग्रेसची धोरणे आजही तशीच आहेत.