‘हिंदु धर्मात दोनदा विवाह करणार्‍यांसाठी वेगळी आणि दारू पिणार्‍यांसाठी वेगळी देवता आहे !’ – CM Revanth Reddy

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे हिंदूंच्या देवतांविषयी संतापजनक विधाने

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी

भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदू किती देवतांवर विश्वास ठेवतात ? ३ कोटी देवता आहेत का ? आणि इतक्या देवता का आहेत ? अविवाहितांसाठी एक देवता म्हणजे हनुमान. दोनदा विवाह करणार्‍यांसाठी वेगळी देवता, दारू पिणार्‍यांसाठी वेगळी देवता. येल्लम्मा, पोचम्मा, मैसम्मा – दारू अर्पणासाठी एक, कोंबडी बळी देण्यासाठी एक, आणि डाळ-भात अर्पणासाठी एक. प्रत्येक समूहाची स्वतःची देवता आहे, असे विधान  तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले.

ते येथील गांधी भवनामध्ये झालेल्या बैठकीत बोलत होते. त्यांच्यावर भाजप, विश्व हिंदु परिषद यांनी टीका केली आहे. तसेच भाग्यनगरच्या गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनीही कठोर टीका केली आहे.

रेवंत रेड्डी यांनी इस्लाम स्वीकारला आहे का ? – आमदार टी. राजा सिंह

टी. राजा सिंह

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी नारायणपेट जिल्ह्यातील मख्तल येथे झालेल्या सभेत बोलतांना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर प्रखर टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या विद्यार्थी संघटनेतून आलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारची विधाने होणे धक्कादायक आहे. रेवंत रेड्डी यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर धर्मांतराची योजना आखली आहे का ? त्या भेटीनंतर ते हिंदूंच्या देवतांना लक्ष्य करण्याचा आणि अपकीर्त करण्याचा विचार करत आहेत का ? रेवंत रेड्डी यांनी इस्लाम स्वीकारला आहे का ? असे प्रश्न विचारले.
राजा सिंह पुढे म्हणाले की, तेलंगणातील हिंदूंनी आता तरी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे खरे स्वरूप ओळखावे. हिंदूंच्या देवतांचा अपमान करणार्‍या व्यक्तीला सत्तेवर आणल्याची जाणीव लोकांनी ठेवली पाहिजे.

भाजप आणि विहिंप यांची टीका

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी सांगितले की भाजपने आधीच चेतावणी दिली होती की, काँग्रेस किंवा भारत राष्ट्र समिती सत्तेत आल्यास हिंदूंचा स्वाभिमान धोक्यात येईल. ही चेतावणी रेवंत रेड्डी यांच्या विधानामुळे खरी ठरली. विश्व हिंदु परिषदने या विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी विनाअट क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

अन्य धर्मीय हिंदु धर्माची जितकी विटंबना करत नाहीत, त्यापेक्षा अधिक विटंबना हिंदु धर्मीय आणि त्यातही पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षाचे नेते करतात ! हे पहाता आता ज्या प्रमाणे पाकिस्तानमध्ये धर्माचा अवमान करणार्‍यांना फाशीची शिक्षा आहे, तसाच कायदा भारतातही करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तरच अशांवर वचक बसेल !