Ram Mandir Dhwajarohan : (म्हणे) ‘भारतातील अल्पसंख्यांकांना दडपण्याचा प्रयत्न !’ – पाकिस्तान

श्रीराममंदिराच्या ध्वजारोहणावरून पाकचा थयथयाट !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अयोध्येतील श्रीराममंदिराची उभारणी आणि ध्वजारोहण, हा भारतातील अल्पसंख्यांकांना दडपण्याचा भाग असून मुसलमानांच्या धार्मिक स्थळांची जाणूनबुजून हानी करण्याचा प्रयत्न आहे, असा थयथयाट पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. बाबरी ढाचा पाडल्याच्या घटनेचा उल्लेख करत बाबरी ‘ऐतिहासिक प्रार्थनास्थळ’ असल्याचे विधान केले.

संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन

पाकिस्तानने भारतातील कथित इस्लामोफोबिया (इस्लामविषयीचा द्वेष), आक्षेपार्ह विधाने आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार यांचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्र अन् इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकने केली आहे. भारतातील मशिदी आणि इस्लामी सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवण्याचे दायित्व स्वीकारण्याचेही आवाहन पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले. (बुजगावणे असणार्‍या संयुक्त राष्ट्रांनी या संदर्भात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये आणि केला, तर त्याला भारताकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, हे त्याने लक्षात ठेवावे ! उलट संयुक्त राष्ट्रांनी पाकमधील हिंदूंची मंदिरे, अहमदीया पंथाच्या मुसलमानांच्या मशिदी, यांविषयी हस्तक्षेप करावा, अशी भारताची मागणी असेल ! – संपादक)

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची दूरवस्था !

पाकिस्तान बाबरी ढाचावरून अश्रू ढाळत असतांना पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची वर्षानुवर्षे दूरवस्था झाल्याविषयी त्याने मौन बाळलेले आहे. पाकिस्तानातील शारदा पीठ, कराचीतील दीडशे वर्षांचे जगन्नाथ मंदिर, रावळपिंडीतील वर्ष १९३० मध्ये उभारलेले मोहन मंदिर, अशा अनेक हिंदु देवस्थानांवर मुसलमानांनी नियंत्रण मिळवले आहे आणि ही मंदिरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्वांवर पाक सरकारने कधी आवाज उठवला नाही; पण ‘भारतातील मशिदींना धोका आहे’, असे सांगत आहे.

संपादकीय भूमिका

पाकच्या या थयथयाटाला भारत भीक घालत नाही ! पाकने बाबरीवरून छाती पिटण्यापेक्षा पाकमधील हिंदूंच्या मंदिरांच्या दूरवस्थेविषयी बोलायला हवे !