human rights violations in PoK : पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबवावे !

भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले !

न्यूयॉर्क (अमेरिका) – आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्यांनी पाकिस्तानच्या बेकायदेशीर कह्यात असलेल्या भागांमध्ये (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) चालू असलेले मानवी अधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबवावे. तेथील जनता पाकिस्तानी सैन्याचे नियंत्रण, दडपशाही, क्रौर्य यांच्या विरोधात उघडपणे बंड पुकारत आहे, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले. पाकने जम्मू-काश्मीरचा विषय मांडल्यानंतर भारताने पाकला सुनावले.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश

येथील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरिश यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीर भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग होता, आहे अन् कायम राहील. जम्मू-काश्मीरमधील लोक भारताच्या लोकशाही परंपरांनुसार आणि घटनात्मक चौकटीत राहून मूलभूत अधिकारांचा वापर करतात. या संकल्पना पाकिस्तानसाठी परक्या आहेत, असा टोलाही हरिश यांनी लगावला.

संपादकीय भूमिका

पाकला शब्दांच्या भाषेत कितीही सुनावले, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही. ते पालथ्या घड्यावरील पाणीच असेल. पाकला ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत त्याला सांगण्याची आवश्यकता आहे !