नवी मुंबईत सत्ताधार्‍यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !

   नवी मुंबई, ५ जून (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने १०० दिवसांत केलेल्या कामाचा गाजावाजा करत प्रसिद्धी केली; मात्र मनसेने या कामांचा पत्रकार परिषद घेऊन पंचनामा केला.

पत्रकार परिषदेत मनसेने मांडलेली सूत्रे

१. नवी मुंबईतील नालेसफाई म्हणजे धूळफेक असून ‘टेंडर’ (निविदा) काढून कंत्राटदारांना पोसण्यासाठी खोटी नालेसफाई केली जाते; मात्र मनसेने नाल्यात उतरून नालेसफाईची पोलखोल केली आहे.

२. नवी मुंबईत दूषित पाणी येते; परंतु महापौर महिलेला पुढे करून मोरबे धरणातील पाणी दूषित नसल्याचे सांगितले जाते. अशा वेळी सभागृह नेते नेरूळ, जुईनगर, कोपरखैरणे, तसेच वाशी विभागातील इमारतींमध्ये जाऊन तेथील घरातील नळाचे पाणी पिऊन प्रात्यक्षिक का दाखवत नाहीत ?

३. पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात पाण्याच्या शीतयंत्रात उंदीर सापडतो. शव देण्यासाठी पैसे आकारले जातात. रक्तदाब आणि मधुमेह यांची औषधे मिळत नाहीत. रुग्णालयात एम्.आर्.आय.चे ( चुंबकीय अनुनाद प्रतिमा तंत्र) यंत्र आले आहे; पण मंत्र्यांना वेळ नसल्याने यंत्राचे उद्घाटन झाले नाही. येत्या ३ दिवसांत वाशी रुग्णालयाची स्वच्छता न झाल्यास मनसेचे पदाधिकारी झाडू हातात घेऊन रुग्णालय स्वच्छ करतील.

४. ठोक मानधन घेणार्‍या कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी केले; पण ६ सहस्र ५०० कंत्राटी कामगारांना कायम न करून पालिकेने त्यांच्यावर अन्याय केला, असे मत मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई म्हणाले.

५. मोरबे धरणाजवळील विचुंबे, देवद यांसह अन्य गावांत पाणी चोरी होत असल्याचे पुराव्यासह सविनय म्हात्रे यांनी दाखवले.

६. नवीन शैक्षणिक वर्ष चालू होऊनही विद्यार्थ्यांचे गणवेश सिद्ध का नाहीत ? महापालिकेच्या ८० शाळांचे ‘फायर ऑडिट’ (अग्निसुरक्षा व्यवस्थेची पडताळणी) का झाले नाही ? अशात अनुचित घटना घडली, तर तिचे दायित्व सत्ताधारी आणि प्रशासन घेणार का ?

७. अजूनही पालिका हद्दीतील मुलांना मागील वर्षीचीच शिष्यवृत्ती मिळालेली नाही.