‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !

‘बालभारती’च्या संचालिका अनुराधा ओक यांची माहिती

पुणे – ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या’ (‘एन्.ई.पी.’च्या) अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वीची पाठ्यक्रम पुस्तके नव्याने प्रकाशित होत आहेत. विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत ही पुस्तके मिळतील. ‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके पालटली जात आहेत, अशी माहिती ‘बालभारती’च्या संचालिका अनुराधा ओक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१. २ री, ३ री, ४ थी आणि ६ वीच्या नवीन पुस्तकांपैकी ७८ टक्के पुस्तकांचे वाटप झाले. ६ कोटी पुस्तके ‘समग्र शिक्षा अभियाना’च्या अंतर्गत विनाशुल्क दिली जाणार आहेत.

२. पाठ्यपुस्तकांतील आशय विद्यार्थ्यांच्या वयानुसार निवडण्यात आला असून अध्ययन निष्पत्ती आणि क्षमताधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे.

३. पुस्तके बाजारात आल्यानंतर कोणतीही त्रुटी अथवा सुधारणा सुचवायची असल्यास नागरिकांनी ‘बालभारती’शी संपर्क साधावा. प्राप्त सूचनांचा समितीकडून विचार करून पुढील आवृत्तीमध्ये पालट केला जाईल.

४. भारतीय ज्ञान प्रणाली, संविधानात्मक मूल्ये, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, लिंगसमभव, सामाजिक मूल्ये आणि जीवनकौशल्ये यांचा समावेश नवीन पुस्तकांमध्ये केला आहे.

५. विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता, संभाषणकौशल्य, नेतृत्व, संघकार्य आणि जिज्ञासा विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश केला आहे.