भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation

बांगलादेशी घुसखोरांना परत घेण्यावरून सीमेवर वाढता तणाव

ढाका (बांगलादेश) – बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर बांगलादेशी घुसखोर आता पुन्हा सीमेकडे जात आहेत. सीमेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरांना पाहून बांगलादेश संतापला आहे. आता ते असा आरोप करत आहेत की, भारत बेकायदेशीर स्थलांतरितांना बळजबरीने बांगलादेशाच्या सीमेत ढकलत (‘पुश-इन’ करत) आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या देवाणघेवाणीवरून पुन्हा एकदा गंभीर राजनैतिक आणि सैनिकी तणाव निर्माण झाला आहे. ‘भारतीय सुरक्षा दलांनी गेल्या २४ घंट्यांत अनेक वेळा घुसखोरांना बळजबरीने बांगलादेशाच्या सीमेत ढकलण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप बांगलादेशाने केला आहे. ‘बॉर्डर गार्ड बांगलादेशा’ने दावा केला की, भारतीय अधिकार्‍यांकडून सीमेच्या विविध भागांतून लोकांना बेकायदेशीरपणे सीमा पार करून पाठवण्याचे किमान १० प्रयत्न त्यांनी हाणून पाडले आहेत.

बॉर्डर गार्ड बांगलादेशाने चेतावणी दिली आहे की, कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीला किंवा समूहाला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे बांगलादेशाच्या क्षेत्रात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाणार नाही. आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापनाचे स्थापित नियम, शिष्टाचार आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारांचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही प्रयत्नाला पूर्ण शक्तीने अन् कठोरपणे विरोध केला जाईल.

बांगलादेशाच्या या आरोपामुळे गेल्या काही महिन्यांत दोन्ही शेजारी देशांमधील संबंध सुधारण्यासाठी चालू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. बांगलादेशाच्या या तीव्र आरोपांवर सध्या भारतीय बाजूकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणावर विचारलेल्या प्रश्‍नांना अन् टिपणीच्या विनंत्यांना अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

सीमेवर २४ घंटे पाळत ठेवणे कठीण

भारत आणि बांगलादेश यांच्यात ४ सहस्र किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे, जी जगातील सर्वांत लांब सीमांपैकी एक आहे. नदी, पर्वत आणि घनदाट जंगले यांसारख्या अत्यंत जटिल भौगोलिक क्षेत्रांतून सीमा जात असल्याने या संपूर्ण सीमेची अचूक नाकेबंदी करणे किंवा २४ घंटे पाळत ठेवणे, हे दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांसाठी नेहमीच एक मोठे आव्हान राहिले आहे.

अनौपचारिक मार्गांवर ढाकाचा आक्षेप

बांगलादेशाच्या सरकारने आणि राजनैतिक अधिकार्‍यांनी यावर भर दिला आहे की, बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवण्यासाठी अन् त्यांच्या परतीसाठी एक निश्‍चित कायदेशीर आणि राजनैतिक आराखडा अस्तित्वात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर भारतात कोणतीही व्यक्ती बेकायदेशीरपणे रहात असेल आणि ती खरोखरच बांगलादेशी नागरिक असल्याचे सिद्ध झाले, तर तिला स्थापित आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अन् औपचारिक राजनैतिक मार्गांनीच परत पाठवले पाहिजे.

या वाढत्या तणावाला न्यून करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील हा गतीरोध सोडवण्यासाठी आता सैनिकी अन् राजनैतिक पातळीवर चर्चेची सिद्धता केली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशाला भारताने त्याला समजेल अशा भाषेत समजावणे आता अपरिहार्य झाले आहे !
  • बांगलादेशी घुसखोरीवर वेळीच लगाम लावणे का आवश्यक होते, हे अशा विरोधातून लक्षात येते. आता या बांगलादेशींची संख्या कोटींमध्ये आहे. यासाठी उत्तरदायी असणारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी पक्ष आदींना उत्तरदायी ठरवून त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई झाली पाहिजे !