Khawaja Asif : (म्हणे) ‘भारत आता अफगाणिस्तानच्या माध्यमातून सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे !’

अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत भेटीवरून पाकच्या संरक्षणमंत्र्यांचा जळफळाट

आमिर खान मुत्ताकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी भारतभेटीवर आले आहेत. ही भेट पाकिस्तानला पचलेली नाही. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ एका मुलाखतीत म्हणाले की, भारत आता अफगाणिस्तानच्या माध्यमातून पाकवर सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे.

(म्हणे) ‘भारतासमवेत अफगाणिस्तानलाही परिणाम भोगावे लागतील !’

आसिफ यांनी पुरावे न देता आरोप केला की, अफगाणी भूमीतून पाकिस्तानवर होणारी आक्रमणे भारताच्या सांगण्यावरूनच होत आहेत आणि त्या आतंकवाद्यांना भारताची साथ मिळत आहे. जर भारताने काबुलमार्गे पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम भारतासमवेत अफगाणिस्तानलाही भोगावे लागतील.

आम्ही अफगाण सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला की, त्याच्या भूमीचा वापर आतंकवाद्यांना आश्रय देण्यासाठी होऊ नये; मात्र अफगाण सरकार म्हणाले, ‘जर पाकिस्तान पुरेसा निधी देईल, तर आम्ही त्यांना दुसरीकडे हालवू’; पण आम्हाला भीती होती की, ते पैसा घेतील आणि आतंकवादी पुन्हा परत येतील.

ख्वाजा आसिफ

तालिबानचा मंत्री भारतातून आम्हाला धमकी देतो !

आसिफ म्हणाले की, पाकिस्तान संवादासाठी सिद्ध आहे; पण अफगाणिस्तान कोणतीही निश्चिती देत नाही. तिथे बंदी घातलेल्या तालिबानी नेत्यांना बुलेटप्रूफ गाड्या दिल्या जात आहेत, आतंकवाद्यांना नवीन ठिकाणी स्थायिक होण्यासाठी साहाय्य केले जात आहे. अफगाण सरकारला या आतंकवाद्यांवर कारवाई करण्यात कोणताही अडथळा नाही; मात्र अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारतात बसून पाकिस्तानला चेतावणी देत आहेत; म्हणजे आता आमच्या बैठकीसाठी भारताची अनुमती घ्यावी लागेल का ?

पाकिस्तानने ९ ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानात हवाई आक्रमण केले होते. त्यानंतर भारताच्या भूमीवरून तालिबानी मंत्र्यांनी पाकिस्तानला चेतावणी देत म्हटले होते की, हा खेळ थांबवा.

पाकच्याच माजी पंतप्रधानांनी टीटीपीला साहाय्य केल्याचा आसिफ यांचा आरोप

आसिफ म्हणाले की, बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेला संपवले जाईल. माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी गुप्तचर प्रमुख जनरल फैज हमीद या दोघांनी खैबर पख्तूनख्वामध्ये टीटीपीच्या ४-५ सहस्र आतंकवाद्यांना वसवले, ज्यामुळे पाकिस्तानातील आतंकवाद पुन्हा जिवंत झाला. जनरल फैज यांनी तालिबानला बुलेटप्रूफ वाहन भेट दिले होते. (यातून हे उघड होते की, पाकिस्तानच आतंकवाद्यांचा पोशिंदा आहे ! – संपादक)