India Slams Pakistan : जर तुमचे जळालेले विमानतळ, हा तुम्हाला विजय वाटत असेल, तर तो साजरा करा !

भारताने पाकच्या पंतप्रधानांना संयुक्त राष्ट्रांतच प्रत्युत्तर देत फटकारले !

भारताच्या प्रतिनिधी पेटल गेहलोत व पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तान ९ मे पर्यंत भारतावर आक्रमण करण्याची धमकी देत होता; पण १० मे या दिवशी भारतीय सैन्याने पाकच्या वायुदलाचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली. जर जळालेले वायूदल तळ विजय असेल, तर पाकिस्तानने तो साजरा करावा, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला फटकारले.

पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी येथे ‘ऑपरेशन सिंदूर’वरून विधान करतांना भारताला पराजित केल्याचा दावा केला होता. त्याला भारताच्या प्रतिनिधी पेटल गेहलोत यांनी सडतोड उत्तर देत शरीफ यांची बोलती बंद केली.

पेटल गेहलोत यांनी शरीफ यांना दिलेले प्रत्युत्तर

१. आतंकवादाला प्रोत्साहन देणे, हा पाकच्या परराष्ट्र धोरणाचा भाग !

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हास्यास्पद नाटक रचले आहे. ते आतंकवादाला प्रोत्साहन देतात. हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचाच भाग आहे. कितीही नाटक किंवा खोटे बोलून सत्य लपवता येत नाही.

२. भारत आणि पाक यांच्यामधील सर्व सूत्रे द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवले जातील. यामध्ये कोणत्याही तिसर्‍या पक्षाची आवश्यकता नाही.

३. पाक भारतद्वेषाने पछाडलेला असल्याने शांततेचा दावा निरर्थक आहे. भारताने आतंकवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे.

४. पाकचे सैन्य आतंकवाद्यांना श्रद्धांजली वहातात !

‘एक चित्र सहस्र शब्द बोलते’, असे म्हटले जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकमधील बहावलपूर आणि मुरीदके येथील आतंकवाद्यांच्या तळांवर मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांची अनेक छायाचित्रे आम्ही पाहिली. जेव्हा पाकिस्तानी सैन्य आणि अधिकारी उघडपणे आतंकवाद्यांना श्रद्धांजली वहातात, तेव्हा त्यांच्या राजवटीविषयी शंका येणार नाही का ?

५. पाकने आतंकवाद्यांचे तळ बंद करावेत !

सत्य हे आहे की, भारतातील निष्पाप नागरिकांवर आतापर्यंत झालेल्या सर्व आतंकवादी आक्रमणांसाठी पाकिस्तान उत्तरदायी आहे. आम्ही आमच्या लोकांचे रक्षण करण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा, तसेच गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्याचा आमचा अधिकार वापरला आहे. पाकने सर्व आतंकवादी तळ त्वरित बंद करावेत आणि सर्व आतंकवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावे.

६. पाकने लादेनला १० वर्षे लपवून ठेवले होते !

हा तोच पाकिस्तान आहे, ज्याने २५ एप्रिल २०२५ या दिवशी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरमधील आतंकवादी संघटनेचे रक्षण केले होते. ही संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांच्या हत्येसाठी उत्तरदायी होती. याच पाकिस्तानने ओसामा बिन लादेन याला १० वर्षे लपवून ठेवले होते. त्यांचे मंत्री आता मान्य करत आहेत की, ते अनेक दशकांपासून आतंकवादी छावण्या चालवत आहेत.