काश्मिरी जनतेच्या मानसिकतेत खरेच परिवर्तन झाले आहे का ?

जम्मू-काश्मीरमधील हजरतबल दर्ग्यावर सरकारने बसवलेला शिलालेख आणि त्यावर भारत सरकारचे मानचिन्ह असलेले ‘अशोक’ हे चिन्ह, म्हणजेच भारताची राजमुद्रा श्रीनगर येथील धर्मांध काश्मिरी जनतेकडून दगडाने ठेचण्यात आली. मुख्य म्हणजे या चुकीच्या कृत्याचे राजरोसपणे ध्वनीचित्रीकरण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे ४ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित करण्यात आले. असे असतांनाही जर काश्मीरमधील धर्मांधांना देशाच्या राजमुद्रेविषयी जर इतका कमालीचा द्वेष आणि राग असेल, तर ते राष्ट्रघातकी आहे.

भारत सरकारचे मानचिन्ह असलेले ‘अशोक’ हे चिन्ह अर्थात भारताची राजमुद्रा श्रीनगर येथील धर्मांध काश्मिरी जनतेकडून दगडाने ठेचली जात असतांना

१. हजरतबलविषयीची घटना हिंदूंना विचार करायला लावणारी !

२२ एप्रिल या दिवशी पहलगाम येथे पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून जिहादी आतंकवाद्यांनी त्यांची हत्या केली. नंतर काही काश्मिरींनी मेणबत्ती मोर्चा काढून नक्राश्रू ढाळलेले होते आणि पर्यटकांची क्षमा मागितली होती. याच वेळी देशातील काही कथित पुरोगामी किंवा सुधारमतवादी विचारवंत यांनी ‘काश्मिरी जनतेकरता पर्यटकांनी निर्धास्तपणे काश्मीरमध्ये पुन्हा जावे; कारण त्यांची सर्व अर्थव्यवस्था ही केवळ पर्यटनावरच अवलंबून आहे’, असे फुकाचे सल्ले दिले होते. आता झालेली घटना ही  कर भरणार्‍या प्रत्येक राष्ट्रप्रेमीला गंभीरपणे विचार करायला लावणारी अशीच आहे. त्यातच काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे एक विधान समोर आले ते, म्हणजे ‘अशोका’ हे मानचिन्ह इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांवर कधीही लावले जात नाही, मग हजरतबल येथे लावण्यामागील नक्की कारण कोणते ?’ खरेतर हे मानचिन्ह अत्यंत द्वेषपूर्ण पद्धतीने तोडलेले असतांना याविषयी वा दोषींच्या विरोधात कोणती कारवाई करण्यात येणार आहे, यावर ओमर अब्दुल्ला काहीही बोलत नाहीत, हे विशेष !

अधिवक्ता अनेश परळकर

२. कोणत्याही बौद्ध नेत्याने निषेध का नोंदवला नाही ?

भारताचे महान सम्राट अशोक यांना सर्व भारतियांमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे, तसेच बौद्ध पंथाच्या प्रसारकरता त्या वेळेस सम्राट अशोक यांनी पूर्णपणे राजश्रय दिला होता आणि त्यामुळे बौद्ध पंथाचा प्रसार अनेक देशांमध्ये त्याकाळी झालेला होता; सबब बौद्ध धर्मियांमध्येही सम्राट अशोक यांना अत्यंत आदराचे स्थान आहे. हजरतबलची घटना घडली असता बौद्ध समाजाचे स्वतःला नेते म्हणवणार्‍यांपैकी किती जणांनी वरील घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे ? किंवा त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे वक्तव्य केलेले आहे का ? याचे उत्तर नक्कीच ‘नाही’ असे असणार.

३. काश्मीरमधील धर्मांधांची राष्ट्रद्रोही मानसिकता

भारताच्या चलनामध्ये आणि मुद्रांक कागदपत्रांवरही अशोक स्तंभ महत्त्वपूर्ण आहे. असे असतांना हे कृत्य केवळ द्वेषपूर्ण नसून ही राष्ट्रद्रोही मानसिकता आहे. काश्मीरमध्ये भारताचा राष्ट्रध्वज जाळण्याचा अपप्रकार अनेकदा घडलेला आहे. यासह जिहादी आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहस्रो धर्मांध सामील होतांना दिसलेले आहेत, तसेच भारतीय सैन्यावर दगडफेक करणे, पाकिस्तानचे गुणगान गाणे, जिहाद्यांना आश्रय देणे, असे अनेक अपप्रकार आतापर्यंत येथे पुष्कळ वेळा घडलेले आहेत.

४. सरकारने दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी !

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० कायमस्वरूपी रहित केलेले असून हा प्रदेश संपूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. राष्ट्रद्रोह्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी प्रत्येक राष्ट्रप्रेमींची मागणी आहे.

– अधिवक्ता अनेश परळकर, मुंबई