‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?

सौ. शेफाली वैद्य

कुठल्याही राजकारणी व्यक्तीसाठी पटकन जाती-पातीवरून भांडणार्‍या हिंदु समाजाला पाहून मला नेहमीच फार उद्विग्न वाटते. इतके सारे उघड होऊनही आपल्याला कसे समजत नाही की, सर्व पक्षांच्या, सर्व धर्माच्या, सर्व विचारधारांच्या राजकारणी लोकांची शेवटी एकच जात असते, ती म्हणजे राजकारणी !

राजकारणी लोकांची आपसांत छान मैत्री असते, त्यांची आपसांत लग्ने होतात, विरोधी पक्षातील राजकारण्यांचे एकमेकांत व्यवसायाचे व्यवहार होतात. प्रतिदिन एकमेकांवर भर सभेत आगपाखड करून दोन वेगळ्या पक्षातील नेते रात्री छान एकत्र जेवण करतात. आपण सामान्य नागरिक मात्र काहीही कारण नसतांना दोन राजकारण्यांमधील मानापमानाचा व्यक्तीगत मुद्दा जातीवरून सार्वजनिक करतो.

एकाच पक्षातील लोक आहेत ना भांडणारे ?कोण बरोबर कोण चूक, यांत मला पडायचे नाही; कारण पुढे काय होईल, हे मला स्पष्टपणे दिसत आहे. ते बघून घेतील त्यांचे त्यांचे. खासदार आणि आमदार एकमेकांची खासगीत किंवा सार्वजनिक क्षमा मागतील. राजकारण मागील पानावरून पुढे चालू राहील. दोन दिवस हा विषय चघळल्यावर मिडिया (प्रसारमाध्यमे) दुसरे विषय शोधायला जातील. होईल मांडवली त्यांच्यात यथावकाश. करतील त्यांचे वरिष्ठ नेते काय करायचे ते.

राजकारणी लोकांना प्रसिद्धी हवी असते, सवंग मिडियाला रात्रंदिवस चघळायला एखादा असा विषय हवाच असतो. या संगीत मानापमानाचा तुमच्या-आमच्या आयुष्यात शून्य तफावत जाणवेल; पण सर्वसामान्य आणि विचारी नागरिकांनी सामाजिक माध्यमांवर ‘ही जात विरुद्ध ती जात’ असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ? व्यक्तीगत आयुष्यातील जवळच्या लोकांना विनाकारण का दुखवायचे ? जरा विचार करा.

– सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध व्याख्यात्या आणि लेखिका, पुणे.