भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, आपले विभाजन झाले ! – विचारवंत संदीप बाळकृष्ण

  • विचारवंत संदीप बाळकृष्ण यांचे ‘वैचारिक आक्रमण : भारताचे आंतरिक शत्रू’ परिसंवादात वक्तव्य

  • प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते चक्रवर्ती सुलिबेले लिखित ‘गौरी लंकेश हत्या आणि हिंदुविरोधी षड्यंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन !

परिसंवादात डावीकडून स्ट्रिंग रिव्हील्सचे श्री. विनोद, श्री. संदीप बाळकृष्ण, श्री. कृष्ण भट्ट, श्री. वृषांक भट्ट, श्री. मोहन गौडा आणि बोलतांना श्री. दीपक राजगोपाल

बेंगळुरू (कर्नाटक) : वास्तवात धर्म म्हणजे सनातन धर्म. भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, तर आपले विभाजन करण्यात आले. सनातन धर्म हाच एकमेव धर्म आहे. अन्य सर्व साम्राज्यवादी नि राजकीय धोरण पुढे रेटणारे पंथ आहेत. ‘रिलिजियन’ ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे, असे वक्तव्य ‘द धर्म डिस्पॅच’चे संस्थापक श्री. संदीप बाळकृष्ण यांनी केले. ते ‘वैचारिक आक्रमण : भारताचे आंतरिक शत्रू’ परिसंवादात बोलत होते. या प्रसंगी ‘युवा ब्रिगेड’चे संस्थापक श्री. चक्रवर्ती सुलिबेले यांनी लिहिलेल्या ‘गौरी लंकेश हत्या आणि हिंदुविरोधी षड्यंत्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनही करण्यात आले. परिसंवादात कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. कृष्ण भट्ट, ‘संवाद टी.व्ही.’चे संपादक श्री. वृषांक भट्ट, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, विश्व हिंदु परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. दीपक राजगोपाल, तसेच ‘स्ट्रिंग रिव्हील्स’चे श्री. विनोद हेसुद्धा सहभागी झाले होते. परिसंवादाला ५०० हून अधिक राष्ट्रप्रामी आणि धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.

युवा ब्रिगेडचे संस्थापक श्री. चक्रवर्ती सुलिबेले यांनी लिहिलेल्या ‘गौरी लंकेश हत्या आणि हिंदुविरोधी षड्यंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन करतांना हिंदुत्वनिष्ठ

बाळकृष्ण पुढे म्हणाले की, जगातील सर्व खंडांमध्ये इस्लाम आणि ख्रिस्ती पंथ पसरला आहे; पण हिंदू वास्तव्य करत असलेला एकमेव देश भारत आहे. जगाला खरे ज्ञान आणि प्रकाश देणारा भारतच आहे. सर्व पंथ आणि संप्रदाय हे हिंदु धर्मरूपी विशाल वृक्षाच्या शाखा आहेत. नेहरूंच्या काळापासून इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांना धर्म म्हणण्याची प्रवृत्ती वाढली. प्रत्यक्षात ते पंथच आहेत. खरा धर्म केवळ सनातन हिंदु धर्मच आहे. ख्रिस्ती धर्माचे खरे स्वरूप ओळखायचे असेल, तर ‘न्यू टेस्टामेंट’ नाही, तर ‘ओल्ड टेस्टामेंट’ अभ्यासले पाहिजे.

निवृत्त न्यायमूर्ती श्री. पी. कृष्ण भट्ट यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, हिंदु जीवनशैली ही सर्वांचे रक्षण करणारी विचारसरणी आहे.

परिसंवादाला लाभलेली हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती

‘गौरी लंकेश हत्या आणि हिंदुविरोधी षड्यंत्र’ या पुस्तकाची माहिती !

या पुस्तकात ‘शहरी नक्षलवाद्यांकडून हिंदु श्रद्धाकेंद्रे, हिंदूसंघटन, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना कशा प्रकारे लक्ष्य केले जात आहे ? यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. उदाहरणार्थ कर्नाटकातील धर्मस्थळ तीर्थक्षेत्र प्रकरणात हिंदु धर्माला लक्ष्य करण्यात आले. त्याचप्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी राजकीय लाभ घेण्यासाठी सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या २० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गौरी लंकेश प्रकरणाला मोठे करण्यात आले. त्यांच्या हत्येचे प्रकरण म्हणजे प्रचंड मोठे हिंदुत्वविरोधी षड्यंत्र आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, ‘हिंदु आतंकवाद ही संज्ञा उच्चारण्यास मला सांगण्यात आले होते’, असा अलीकडेच गौप्यस्फोट केला आणि साध्वी प्रज्ञासिंह निर्दाेष मुक्त झाल्या, त्याप्रमाणेच गौरी लंकेश हत्या प्रकरणात सर्व हिंदुत्वनिष्ठांना निर्दाेष सोडले जाईल’, असा विश्वास सुलीबेले यांनी या पुस्तकातून व्यक्त केला आहे.

इंग्रजांच्या काळात हिंदूंवर वैचारिक आक्रमण झाले ! – मोहन गौडा

परिसंवादाला संबोधित करतांना श्री. मोहन गौडा म्हणाले की, सनातन धर्मावर शतकानुशतके विविध प्रकारची आक्रमणे झाली आहेत. मुसलमान आक्रमकांकडून प्रत्यक्ष आक्रमणे झाली, तर इंग्रजांच्या काळात वैचारिक आक्रमण झाले. स्वातंत्र्यानंतर शहरी  नक्षलवादी धर्म, इतिहास आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर सातत्याने वैचारिक आक्रमणे  करत आहेत. हिंदूंचा बुद्धीभेद करणार्‍या अशा आक्रमणांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. या वेळी श्री. गौडा यांनी हिंदूंनी ‘शत्रूबोध’ का करून घेतला पाहिजे, यावर प्रकाश टाकला.