बानू मुश्ताक यांनी इस्लामवर टीका केली असती, तर त्यांना दगडांनी ठेचून ठार मारले असते ! – BJP MLC C.T. Ravi

भाजपचे आमदार सी.टी. रवि यांचे वक्तव्य

भाजपचे आमदार सी.टी. रवि व लेखिका बानू मुश्ताक

रायचुरू (कर्नाटक) – हिंदुद्वेषी लेखिका बानू मुश्ताक यांनी जसे देवी भुवनेश्वरी आणि कन्नड सांस्कृतिक चिन्हे यांच्या विरुद्ध वक्तव्ये केली, तशी टिपणी जर त्यांनी इस्लामविरुद्ध केली असती, तर त्यांना दगडांनी ठेचून ठार मारले गेले असते, असे वक्तव्य भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकाचे आमदार सी.टी. रवि यांनी केला. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुश्ताक यांचे विचार या भूमीच्या संस्कृतीच्या विरोधात आहेत. मैसुरू येथील दसर्‍याचे उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, जर आपण इस्लाम, कुराण किंवा महंमद पैगंबर यांच्याविषयी असेच काही बोललो, तर ते सहन करतील का ? आम्ही केवळ अशी मागणी करतो की, बानू मुश्ताक यांनी बहुसंख्य समुदायाच्या भावना दुखावल्यावरून जाहीर क्षमा मागावी.

या वेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत म्हटले की, ते मतपेटीचे राजकारण करत आहेत.

चामुंडीमातेचा शाप टाळायचा असेल, तर बानू मुश्ताक यांनी येऊ नये ! –  आमदार बसनागौडा पाटील यत्नाळ

आमदार बसनगौडा पाटील

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी यंदाच्या मैसुरू दसरा उद्घाटनासाठी लेखिका बानू मुश्ताक यांना निमंत्रित करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा पुन्हा निषेध केला. ते म्हणाले की, दसरा हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर तो सनातन हिंदु धार्मिक परंपरेवर आधारित सोहळा आहे. चामुंडीदेवीच्या मिरवणुकीचे उद्घाटन फुलांनी पूजा करून केले जाते. जी व्यक्ती कन्नड ध्वज आणि हळदी-कुंकू यांच्याविषयी वाईट बोलते, अशा व्यक्तीची दसरा उद्घाटनासाठी निवड करणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारची चूक आहे. जर बानू मुश्ताक यांना चामुंडीमातेचा शाप टाळायचा असेल, तर त्यांनी दसरा उद्घाटनाच्या कार्यक्रमातून दूर रहाणे त्यांच्यासाठी हिताचे राहील.