Sanatan Sanstha Defamation Notice : सनातन संस्थेकडून पृथ्वीराज चव्हाण यांना मानहानीची नोटीस !

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ म्हटल्याचे प्रकरण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक

मुंबई – नुकताच वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. या निकालामुळे ‘भगव्या आतंकवादा’चा काँग्रेसी षड्यंत्राचा बुरखा फाटला. तशी वृत्तेही प्रसिद्ध झाली. त्यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भगवा दहशतवाद’ म्हणू नका, तर ‘सनातनी दहशतवाद’ म्हणा, असे म्हणत सनातन धर्मावर टीका केली. त्याविषयी हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध झाल्यानंतर सारवासारव करतांना त्यांनी ‘मी धर्माला नव्हे, तर मी सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ म्हटले’, असे स्पष्टीकरण दिले. हे वक्तव्य खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असून या प्रकरणी त्यांना सनातन संस्थेचे विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्या वतीने अधिवक्त्यांच्या मार्फत १० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेची विनाअट क्षमा मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवावी, अशी चेतावणी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली आहे.

या नोटिसीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी क्षमा मागणे, मूळ मुलाखतीइतक्याच लिखाणाने ती क्षमायाचना प्रसिद्ध करणे, भविष्यात कोणतीही अपकीर्तीकारक विधाने न करणे आणि १० सहस्र रुपये कायदेशीर हानीभरपाई देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांनी नोटिसीत म्हटले आहे की, चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतिमा मलीन झाली असून सहस्रो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले प्रविष्ट (दाखल) करण्यात येणार आहेत.

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !

याविषयी अधिक माहिती देतांना श्री. अभय वर्तक म्हणाले,

‘‘पृथ्वीराज चव्हाण आज सांगत आहेत की, ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकरी यांचा ‘पवित्र भगवा’ आहे. त्यामुळे ‘भगवा आतंकवाद’, असे कुणी म्हणू नये. तसे आवाहन त्यांनी काँग्रेसी नेत्यांनाही केले आहे; पण जेव्हा मालेगाव प्रकरण झाले, त्या वेळी काँग्रेसचे पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी यथेच्छपणे ‘भगवा आतंकवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले, तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नव्हते का ? इतकी वर्षे ते झोपले होते का ?’’