Rajnath Singh On ‘Operation Sindoor’ : ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश युद्ध नाही, तर आतंकवादी केंद्र उद्ध्वस्त करणे होता !

संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

राजनाथ सिंह

नवी देहली – भारताने पाकमधील आतंकवाद्यांच्या विरोधात चालवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले; कारण आम्ही निश्‍चित केलेले लक्ष्य सैन्याने साध्य केले होते. ‘भारताने दबावाखाली हे ऑपरेशन थांबवले’, हे म्हणणे चुकीचे आहे. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकमधील आतंकवाद्यांच्या तळांना नष्ट करणे होता, युद्ध करणे नव्हता. आगामी काळात जर पाकिस्तानने कुरापती केल्या, तर ऑपरेशन पुन्हा चालू होईल, अशी चेतावणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. ते संसदेत ऑपरेशन सिंदूरविषयी चालू असलेल्या चर्चेत बोलत होते. या विषयावर १६ तास चर्चा करण्यात येणार आहे.


लोकसभेत राजनाथ सिंह यांनी या कारवाईची संपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानने भारताच्या सैनिकी तळांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आम्ही हे आक्रमण हाणून पाडले. पाकिस्तान भारतात कोणत्याही ठिकाणी आक्रमण करू शकला नाही. भारतीय सैन्याने शत्रूचा प्रत्येक डाव उधळून लावला. जर मागील सरकारांनी वर्ष २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक आणि वर्ष २०१९ चा एअरस्ट्राईक यांसारखी पावले उचलली असती, तर परिस्थिती वेगळी असती. आज भारत आतंकवादाच्या मुळाशी जातो आणि तो संपवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही पाऊल उचलावे लागेल, ते आपण उचलू. आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की, आपली एकता ही सर्वांत मोठी शक्ती आहे. भारत आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यास दृढ आहे, असा संदेश गेला आहे.

संपादकीय भूमिका

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकला नष्ट करायला हवे होते, त्याचे ४ तुकडे करायला हवे होते, अशीच भारतियांची अपेक्षा होती. याचा सरकारने विचार करायला हवा होता, असेच आता म्हणावे लागेल ! कारण पाक भारतात पुन्हा आतंकवादी कारवाया करणार नाही, हिंदूंची हत्या करणार नाही, खलिस्तानी प्रवृत्तींना साहाय्य करणार नाही, याची कुणीही शाश्‍वती देऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे !