Urban Naxals In Wari : ‘संविधान समता दिंडी’द्वारे वारीत शिरलेले सचिन माळी आणि शीतल साठे हे शहरी नक्षलवादीच !

  • दोघेही गृहविभागाने नक्षलवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या ‘कबीर कला मंच’चे कार्यकर्ते !

  • विद्रोही विचारांद्वारे शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न !

शीतल साठे आणि सचिन माळी

मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’, असे आवाहन करत वर्ष २०२२ मध्ये ‘संविधान समता दिंडी’त सहभागी झालेले सचिन माळी आणि शीतल साठे या पती-पत्नीचा गडचिरोली येथे नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय सहभाग होता. त्यांच्या नक्षलवादी कारवायांचे सबळ पुरावे उपलब्ध झाल्यावर वर्ष २०१३ मध्ये ‘अनलॉफुल ॲक्टिविटीज (प्रिव्हेन्शन) ॲक्ट (युएपीए) अंतर्गत या दोघांना अटकही झाली होती. महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने ‘नक्षलवादी संघटना’ म्हणून घोषित केलेल्या ‘कबीर कला मंचा’चे हे दोघेही कार्यकर्ते आहेत. ते दोघेही नास्तिक आहेत. या दोघांनी एकीकडे नक्षली कारवाया करणे आणि दुसरीकडे वारीतील ‘संविधान समता दिंडी’मध्ये सहभागी होणे हा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे. यावर्षीही अंनिसचे पदाधिकारी अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली देव मानत नसलेले काही अंनिसवाले वारीत सहभाग झाले होते.

सचिन माळी आणि शीतल साठे ही दोघेही गाणी, भारूड, पोवाडे यांद्वारे समाजात विद्रोही विचार पसरवण्याचे काम अनेक वर्षांपासून करत आहेत. ‘आम्ही देव्हारे बाजूला सारले’, ‘३३ कोटी देवांचा जथा; पण एकाचाबी लागना पता’ अशी त्यांची गीते संकेतस्थळावर आजही उपलब्ध आहेत. ‘एकीकडे देवाला बाजूला करा’, असे उघडपणे आवाहन करणारी ही मंडळी विद्रोही विचारांद्वारे शहरी नक्षलवादाचा अजेंडा राबवण्यासाठीच वारीत शिरली आहेत. त्यासाठी सोयीस्कररीत्या राज्यघटना पुढे करत आहेत. या सर्व शक्यतांची पोलिसांनी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रप्रेमींचे म्हणणे आहे.

नक्षली कारवायांमध्ये सक्रीय सहभाग !

नोव्हेंबर २०११ आणि एप्रिल २०१२ या कालावधीत गडचिरोली येथील जंगलामध्ये ही दोघेही नक्षलवाद्यांसमवेत सक्रीय असल्याचे पुरावे असल्याची माहिती गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी माध्यमांना दिली आहे. वर्ष २०१३ मध्ये शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांनी विधानभवनाच्या येथे जाऊन पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. या वेळी शीतल साठे गर्भवती होती. यामुळे कोणताही धोका न पत्करण्यासाठी ते दोघे पोलिसांना शरण गेल्याचे सांगितले जात आहे. त्यांना अटक झाल्यावर शीतल साठे हिला मारहाण केली जाऊ नये, यासाठी फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन, थायलंड, पोर्तुगाल आणि जर्मनी या देशांतून ५० हून अधिक पत्रे मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात अन् भायखळा येथील महिला कारागृहात आली. अशी माहिती त्या वेळी पोलिसांकडून देण्यात आली होती. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे.


हे ही वाचा → ANIS In Wari : देवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अंनिसवाल्यांचा ‘संविधान समता दिंडी’च्या आडून वारीत शिरकाव !

नास्तिक असलेले अंनिसवाले वारीत कशासाठी ?

सचिन माळी हा जसा ‘कबीर कला मंचा’मध्ये सहभागी होता, तसा तो अंनिसमध्येही सक्रीय होता. ‘आम्ही देव्हारे बाजूला सारले’ या त्याच्या यू ट्यूबवरील व्हिडिओमध्ये ‘मी वर्ष २००१ मध्ये जेव्हा चळवळीत आलो, तेव्हा अंनिसचे काम करत होतो’, असे त्याने  स्वत:च सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. दाभोलकर यांच्या कार्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्याने केले आहे. वर्ष २०११ मध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तांनी सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि आयुक्त यांना नक्षली कारवायांमध्ये थेट संबंध असलेल्या ७, तर नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या ५५ अशी ६२ संघटनांची नावे पाठवली होती. यांमध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनांमध्ये ५० व्या क्रमांकावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस)चे नाव आहे. अंनिसच्या गोंदिया जिल्ह्याचा कार्याध्यक्ष नरेश बनसोड याला ८ मे २००७ या दिवशी पोलिसांनी अरुण फेरीरा, धमेंद्र भुरले या नक्षलवाद्यांसमवेत अटक केली होती. हे सर्व प्रकार अंनिसच्या कार्याविषयी संशय व्यक्त करणारे आहेत. 

संपादकीय भूमिका

शहरी नक्षलवाद्यांचे वारीमध्ये काय काम ? वारीत सहभागी होऊन समाजात दुफळी माजवण्याचे किंवा वारीमध्ये घातपाती कारवाया घडवून आणण्याचा त्यांचा हेतू नसेल कशावरून ? पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार ?

  • सत्ता असतांना ‘नक्षलवादी’ घोषित करणार्‍या संघटनांना काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीकडून समर्थन !  

  • वारीत शिरलेल्या शहरी नक्षलवाद्यांचे प्रकरण

मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – कबीर कला मंच ही ‘नक्षलवादी संघटना’, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही ‘नक्षलवाद्यांशी संबंध असलेली संघटना’ असल्याचा अहवाल काँग्रेस आघाडीच्या काळातच वर्ष २०११ मध्ये तत्कालीन गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी केंद्रीय गृहविभागाकडे पाठवला होता. पंढरीच्या वारीमध्ये ‘संविधान समता दिंडी’मध्ये याच संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या संघटनांचे नक्षलवादी संघटनांशी संबंध लक्षात घेता काही वारकर्‍यांनी वारीत शिरलेल्या या शहरी नक्षलवाद्यांची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. काँग्रेस सत्तेत असतांना तिनेच प्रथम या संघटनांना नक्षलवादी ठरवले होते; मात्र वारकर्‍यांनी चौकशीची मागणी केल्यावर मात्र काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीने या संघटनांचे समर्थन केले आहे. २ जुलै या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर या संघटनांच्या समर्थनार्थ आंदोलन केले.

काँग्रेस सरकारच्या काळात रा.रा. पाटील गृहमंत्री असतांना राज्यातील नक्षलवादी संघटना आणि नक्षलवाद्यांशी संबंधित संघटना म्हणून महाराष्ट्रातील ७२ संघटनांची नावे केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवली होती. ही नावे लोकसभेतही सादर करण्यात आली आहेत. राज्याच्या गुप्तवार्ता विभागानेही या संघटना नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचा अहवाल काँग्रेस सरकराच्या काळातच गृहमंत्री रा.रा. पाटील यांना सुपूर्द केला होता. यामध्ये ७ संघटना सक्रीय नक्षलवादी म्हणून नमूद करण्यात आले होते. ‘कबीर कला मंच’ ही त्यातीलच एक संघटना आहे आणि पंढरीच्या वारीत याच संघटनेचे कार्यकर्ते सहभागी आहेत.

संपादकीय भूमिका

काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीला नक्षलवाद मान्य आहे, असे यातून समजायचे का ?