ANIS In Wari : देवाचे अस्तित्व नाकारणार्‍या अंनिसवाल्यांचा ‘संविधान समता दिंडी’च्या आडून वारीत शिरकाव !

  • संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन नाकारणारे लोक संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार !

  • ‘संविधान समता दिंडी’मध्ये यापूर्वी सहभागी झालेल्या काही जणांवर नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे नोंद झाले आहेत गुन्हे !

पुणे, १९ जून (वार्ता.) : हिंदूंच्या देवता, संत आणि श्रद्धास्थाने यांची सातत्याने निंदानालस्ती करणारे, एवढेच नव्हे, तर देवाचे अस्तित्वच मान्य नसलेल्या अंनिसवाल्यांनी ‘संविधान समता दिंडी’ या गोंडस नावाखाली आषाढी-एकादशी वारीत शिरकाव केला आहे.

‘संविधान समता दिंडी’ची कार्यक्रम पत्रिका

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन नाकारणारे, तसेच संत तुकारामगाथा पाण्यावर तरंगल्याचा चमत्कार नाकारणारे अंनिसवाले संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. ही भोंदूगिरी लक्षात येऊ नये, यासाठी हीच नास्तिकतावादी आणि पुरोगामी मंडळी ‘संविधान समता दिंडी’च्या नावाने वारीत सक्रीय आहेत. ‘संविधान समता दिंडी’मध्ये यापूर्वी सहभागी झालेल्या काही जणांवर नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे गुन्हेही नोंद झाले आहेत.

‘संविधान समता दिंडी’कडून २१ जून ते ६ जुलै २०२५ या कालावधीत पुणे ते पंढरपूर अशी दिंडीतील सहभागाविषयीची पत्रिका प्रसारित करण्यात आली आहे. या पत्रिकेवर ‘संयोजक’ म्हणून ज्यांनी नावे दिली आहेत, त्यांतील बहुतेक अंनिसचे कार्यकर्ते आहेत, तर काही अंनिसच्या कार्याशी जोडलेले आहेत. विशेष म्हणजे ‘संविधान समता दिंडी’चा प्रसार अंनिसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामाजिक माध्यमांद्वारे करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी कथित कीर्तनकार बाळकृष्ण वसंत गडकर यांनी कीर्तनात संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठ गमन, तसेच इंद्रायणी नदीत बुडवलेले संत तुकाराम महाराज यांची गाथा तरंगल्या, यांविषयी प्रश्न उपस्थित केला. बाळकृष्ण गडकर हे अंनिसशी जोडलेले आहेत. त्यांच्याप्रमाणेच अंनिसशी जोडलेली आणि स्वत:ला ‘ह.भ.प.’ म्हणवून घेणारी मंडळी ‘संविधान समता दिंडी’त सहभागी होऊन संतांचे अभंग सोयीनुसार वापरून नास्तिकतावादाचा ‘अजेंडा’ राबवत आहेत.

अंनिसचे पदाधिकारी अविनाश पाटील यांचा सामाजिक माध्यमाद्वारे संविधान समता दिंडीचा प्रसार

हा घ्या नक्षलवाद्यांच्या सहभागाचा पुरावा !

वारीत सहभागी झालेल्या ‘कबीर कला मंचा’च्या कार्यकर्त्या शीतल साठे सोबत तिचे यजमान सचिन माळी

‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या घोषवाक्याच्या आडून राज्यघटनेतील मूल्यांचा प्रसार करण्यासाठी या उपक्रमात वर्ष २०२२ मध्ये ‘कबीर कला मंच’ या डाव्या विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्या शीतल साठे सहभागी झाल्या होत्या. दिंडीत शिरून राज्यघटनेच्या मूल्यांच्या गप्पा मारणार्‍या शीतल साठे यांच्यावर वर्ष २०१३ मध्ये ‘अनलॉफुल ॲक्टिविटीज (प्रिवेन्शन) ॲक्ट’ (युएपीए) अंतर्गत माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये त्यांचे पती सचिन माळी यांचेही नाव होते. या दोघांनी न्यायालयापुढे आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती.

वारीमधील एका कार्यक्रमात बोलतांना अनिसचे पदाधिकारी अविनाश पाटील

अंनिसवाल्यांनीच वारीला अंधश्रद्धा ठरवण्यासाठी केला होता प्रयत्न !

राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना वर्ष २००४ पासून अंनिसचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. या कायद्यासाठीचे प्रारूप काँग्रेसने डॉ. दाभोलकर यांच्या साहाय्याने सिद्ध केले. या कायद्याच्या विधेयकामध्ये ‘शारीरिक, आर्थिक आणि मानसिक’ बाधा पोचवणार्‍या कृतीला अंधश्रद्धा ठरवण्याच्या कलमाचा समावेश होता. वारकरी शारीरिक कष्ट घेऊन, म्हणजे पायी चालत पंढरपूरला जातात. हे लक्षात घेऊनच अंनिसवाल्यांनी जाणीवपूर्वक या कायद्यात या कलमाचा समावेश केला होता. यामध्ये चमत्कारांनाही अंधश्रद्धा संबोधण्यात आले होते. त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणीतून वर येणे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवणे आणि भिंत चालवणे, हे सर्व अंधश्रद्धेच्या कक्षेत येत होते. त्यामुळे समस्त वारकरी, हिंदु जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडले. त्यामुळे सरकारला या कायद्यातून ही आक्षेपार्ह कलमे हटवावी लागली होती. या कायद्याच्या माध्यमातून वारकर्‍यांच्या श्रद्धेवर घाला घालण्यात अपयशी ठरलेले हेच अंनिसवाले थेट वारीत शिरून हे काम करण्याचे षंड्यंत्र रचत आहेत.

नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या अंनिसवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव लावण्यापूर्वी ‘महाराष्ट्र मानवी नास्तिक मंच’ या नावाने अंनिसवाले कार्यरत होते. लोकांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून या नास्तिकतावादी मंडळींनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, असे स्वतःचे गोंडस नाव लावून घेतले; परंतु अनेक गोष्टींमध्ये त्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार समोर आलेले आहेत. मागील महिन्यामध्ये यांचा कार्यकर्ता रायगड जिल्ह्यातल्या डोणगाव या ठिकाणी नक्षलवादी कारवायांमध्ये पकडला गेला आहे. यापूर्वी गोंदिया आणि नागपूर येथेही नक्षलवादी कारवायांशी संबंधित असलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.

नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍या आणि ‘अर्बन नक्षलवादा’चे कार्य करणार्‍या या संघटनेवर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • भोळ्या-भाबड्या वारकर्‍यांचा बुद्धीभेद करून त्यांना नास्तिक बनवू पहाणार्‍यांवर सरकारने तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे ! यासाठी समस्त वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच राजकीय पक्षांतील हिंदूंनी पाठपुरावा केला पाहिजे !
  • समस्त हिंदूंनी आता तरी एक होऊन हिंदु धर्माच्या मुळावर उठलेल्यांना सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे !
  • अशांच्या धर्मविरोधी प्रचाराला बळी न पडण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन स्वतःतील धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे !
  • असे धर्मविरोधी लोक कधी अन्य पंथियांच्या धार्मिक कार्यक्रमात अशा प्रकारे सहभाग घेतात का ?, असा प्रश्न हिंदूंनी अशांना विचारला पाहिजे !