Pakistan UNSC Presidency : पाकिस्तान बनला ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चा अध्यक्ष : भारताने आतंकवादाच्या सूत्रावर केले लक्ष्य !

न्यूयॉर्क – पाकिस्तानने ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर  भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने सीमापार आतंकवादात पाकिस्तानचा  सहभाग उघड केला. पाकिस्तान समर्थित आतंकवाद्यांनी केलेल्या पहलगाम आक्रमणाकडे भारताने लक्ष वेधले. या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू केले होते. पाकिस्तान आता अनेक जागतिक सूत्रांवर भारतविरोधी पावले उचलू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान चीनसमवेत काम करत आहे.

१. पाकिस्तानची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होण्याच्या एक दिवस आधी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर ‘द ह्युमन कॉस्ट ऑफ टेररिझम’ नावाचे प्रदर्शन आयोजित केले होते. परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, हे प्रदर्शन आतंकवादातील गुन्हेगारांना उघडे पाडण्यासाठी आणि जागतिक स्तरावर आतंकवादाविरुद्ध एकतेची मागणी करण्यासाठी आहे.

२. गेल्या महिन्यात इराणवरील आपत्कालीन सत्रात पाकिस्तानने अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या आक्रमणाचा निषेध करण्याची मागणी केली होती. चीन आणि रशिया यांच्यासह पाकिस्तानने अमेरिका अन् इस्रायल यांनी केलेल्या बॉम्बस्फोटांचा निषेध करणारा ठराव सादर केला होता.

३. इस्रायल-हमास संघर्षात पाकिस्तान पॅलेस्टाईनसमवेत असून हे सूत्र तो काश्मीर सूत्राशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु आतापर्यंत पाकला कुणाचाही पाठिंबा मिळू शकलेला नाही.