PM Modi Warn Pakistan : पाकच्या छुप्या युद्धाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल !

पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्णावती (गुजरात) –  आम्ही पाकिस्तानातील आतंकवाद्यांचे ९ तळ २२ मिनिटांत उद्ध्वस्त केले. हे सर्व करतांना कॅमेरे वापरण्यात आले. जेणेकरून कुणीही पुरावे मागणार नाही. आता आपल्याला पुरावे देण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानमध्ये ज्या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रा काढण्यात आल्या, त्यांना राज्य सन्मान देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानी झेंडे ठेवण्यात आले. यावरून हे सिद्ध होते की, आतंकवादी कृत्ये ‘छुपे युद्ध’ नाही. ही एक विचारपूर्वक केलेली युद्धनीती आहे. म्हणून त्याचे उत्तर त्याच पद्धतीने दिले जाईल, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे एका जाहीर सभेत केले.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे

१. युद्धात जिंकू शकत नाही; म्हणून पाकने आतंकवाद्यांद्वारे छुपे युद्ध चालू केले !

वर्ष १९४८ मध्ये आतंकवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतले, त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना मारले पाहिजे होते. त्या वेळी सरदार पटेल यांचे शब्द ऐकले गेले नाहीत.  या मुजाहिदीनांनी रक्त चाखले होते. ही मालिका ७५ वर्षांपासून चालू आहे. पहलगाम  त्याचा एक भाग होता. जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले, तेव्हा भारताच्या सैन्य शक्तीने तिन्ही वेळा पाकिस्तानला पराभूत केले. पाकिस्तानला समजले की, ते भारताविरुद्ध युद्धात जिंकू शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी छुपे युद्ध चालू केले. आतंकवाद्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन त्यांना भारतात पाठवले जाते.

२. भारत विरांची भूमी !

हा देश महान सांस्कृतिक परंपरेने पुढे गेला आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे) चा संस्कार आपल्यावर करण्यात आला आहे. ते आपले चारित्र्य आहे. आपण ते जगलो आहोत. ‘इतरांना आनंदाने जगू द्या आणि स्वतःही आनंदाने जगा’, या विचाराचे आपण सहस्रो वर्षे पालन करत आहोत; पण जेव्हा आपल्या शक्तीला वारंवार आव्हान दिले जाते, तेव्हा हा देश विरांची भूमी होतो.

३. लवकरच तिसरी अर्थव्यवस्था बनू !

आपण अर्थव्यवस्थेत जपानला मागे टाकले आहे. जेव्हा आपण सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोचलो तेव्हा संपूर्ण देशात एक वेगळाच उत्साह होता; कारण आपण २५० वर्षे आपल्यावर राज्य करणार्‍या ब्रिटनला मागे टाकले होते. आता तिसर्‍या स्थानावर येण्याचा दबाव आहे. अर्थव्यवस्थेत तिसर्‍या स्थानावर येण्यासाठी देश अधिक वेळ वाट पहाणार नाही. आपल्याला जगभर भारताचा झेंडा फडकवायचा आहे.

४. परदेशी वस्तू विकणार नाही, अशी शपथ घ्या !

गावागावांतील व्यापार्‍यांनी शपथ घ्यावी की, परदेशी मालातून कितीही नफा होत असला, तरी ते परदेशी वस्तू विकणार नाहीत. आजकाल छोट्या डोळ्यांचे गणपति बाप्पा परदेशातून येत आहेत. या गणपतीचे डोळेही उघडे नाहीत. होळीचे रंग आणि पिचकारीपर्यंत सर्व वस्तू परदेशातून आयात होत आहेत. तुमच्याकडे ज्या परदेशी वस्तू आहेत, त्या फेकण्यास मी सांगत नाही; पण ‘वोकल फॉर लोकल’साठी (स्वदेशी मालाला प्रोत्साहन देण्यासाठी) तुम्ही नवीन परदेशी उत्पादने वापरू नका. आज भारतात अनेक वस्तूंचे उत्पादन होत आहे. आपल्याला ‘मेड इन इंडिया’ (भारतातील उत्पादन) ब्रँडचा अभिमान असायला हवा.