ठाणे येथील ‘पितांबरी उद्योग समूहा’चे सर्वेसर्वा डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची उद्योजक म्हणून सामाजिक बांधीलकी सर्वश्रुत आहे; पण ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीवर निष्ठा ठेवून हिंदुत्व जपणारे, धर्मरक्षणासाठी सज्ज असणारे आणि राष्ट्रसेवेला सर्वोच्च मानणारे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सच्चे स्वयंसेवक अन् कट्टर राष्ट्रभक्तही आहेत. बालपणापासूनच त्यांना संघ विचारांचे बाळकडू लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पितांबरी’ उद्योग व्यावसायिकतेसह सत्शीलता, संस्कृती आणि राष्ट्रीय मूल्ये यांचीही उंची जपत आहे. ‘व्यवसाय’ आणि ‘राष्ट्रसेवा’ या क्षेत्रांमध्ये समतोल राखणार्या डॉ. प्रभुदेसाई यांचे कार्य, म्हणजे नवभारतनिर्मितीत योगदान देणार्या आदर्श राष्ट्रभक्ताची प्रेरणादायी कथा आहे. या तेजस्वी व्यक्तीमत्त्वाचे राष्ट्रप्रेम उलगडणारा हा लेख !

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. धर्मप्रसार आणि राष्ट्रकार्य यांत कार्यरत असलेल्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे, हेच खरे धर्मकार्य !
रवींद्रजींचे वडील कै. वामनराव प्रभुदेसाई हे संघाचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यामुळे संघ शाखा हा रवींद्रजींच्या बालपणापासूनच आयुष्याचा अविभाज्य भाग होता. संघाची शाखा, म्हणजे व्यक्तीमत्त्व घडवणारी कार्यशाळा ! त्यामुळे शाखेत जाणे झाले नाही, तर ओणवे (वाकून) उभे रहाणे किंवा उपाशी रहाणे, अशी शिक्षा त्यांना वडील करत असत. लहानपणापासून झालेल्या संघ संस्कारांमुळे शिस्तीचे पालन करणे, राष्ट्रकार्याला प्राधान्य देणे, हा त्यांचा स्थायीभाव झाला. रवींद्रजी पूर्वी शाखेत बिगुल वाजवत असत. आज खरोखरच या बिगुलाचा विजयी स्वर ‘पितांबरी’ उद्योगसमूहाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर गुंजत आहे. ‘पितांबरी’चा उद्योग सत्शीलतेकडे झुकला आणि यशस्वी झाला. स्वतःचा उद्योग सांभाळत त्यांनी संघाचे कार्य सातत्याने चालू ठेवले आहे. अलीकडे ‘हिंदुत्व’ आणि ‘राष्ट्रवाद’ असे विषय पुढे येत असतांना अनेक उद्योजक अशा संवेदनशील सूत्रांपासून चार हात दूर रहाणेच पसंत करतात, अर्थात् ती त्यांची व्यावसायिक आवश्यकताही असते; परंतु रवींद्र प्रभुदेसाई हिंदुत्व, राष्ट्रीयता या सूत्रांकडे डोळसपणे पहातात. त्यांना योग्य वाटणार्या भूमिका ते निष्ठेने मांडतात. ‘हिंदुत्व’ हा संघाच्या विचारांचा पाया आहे आणि हिंदुत्वासाठी सर्वकाही करण्याची रवींद्रजींची सिद्धता असते. त्यासाठी शक्य तेवढे आर्थिक पाठबळ आणि त्यासह वैचारिक पाठबळ ते नेहमीच देत आले आहेत.
अ. याचेच उदाहरण, म्हणजे बाबरी ढाचा भुईसपाट करण्यासाठी ठाण्यातील, तसेच ‘पितांबरी’च्या कर्मचार्यांमधील कारसेवकांना त्यांनी पाठिंबा, प्रोत्साहन आणि सर्वतोपरी साहाय्य केले होते. आज अयोध्येतील श्रीराममंदिर उभारणीसाठीही त्यांनी सढळ हस्ते अर्पण केले.
आ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी श्री. सुधीर फडके यांचा ‘वीर सावरकर’ चित्रपट बजरंग दलाच्या सर्व स्वयंसेवकांना विनामूल्य दाखवण्यासाठी त्यांनी ठाणे येथील ‘आराधना’ चित्रपटगृह आरक्षित केले होते. त्या काळात ठाणे येथे अनेकदा सामाजिक आणि धार्मिक कारणांमुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती. अनेक कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या पोलीस तक्रारी करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी जामिनासाठी रोख रक्कम भरून कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. रवींद्रजी कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभे रहातील, ही निश्चिती असल्यामुळे ठाण्यातील बजरंग दलाचे कार्यकर्ते सामाजिक-धार्मिक प्रश्नांना समर्थपणे सामोरा जाऊ शकतो, तसेच अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी ‘पितांबरी’ उद्योगसमूहात नोकर्याही दिल्या.

इ. छत्रपती संघ शाखेचे स्वयंसेवक, विश्व हिंदु परिषदेच्या कोकण प्रांताचे उपाध्यक्ष, ‘संस्कार भारती’चे ठाणे शहराचे माजी अध्यक्ष आणि संरक्षक अशा विविध पदांवरील उत्तरदायित्व त्यांनी लीलया पार पाडले आहे. त्याचप्रमाणे सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद अशा अनेक संस्थांशी ते जोडलेले आहेत.

ई. धर्मप्रसार आणि राष्ट्रकार्यात सक्रीय असलेल्या संस्थांना ‘सत्पात्री दान’ करून त्यांच्या कार्यास आर्थिक अन् वैचारिक पाठबळ देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. नुकतेच सांगायचे झाले, तर विश्व हिंदु परिषदेच्या नवीन कार्यालयाची उभारणी, रक्तपेढ्या, हिंदु जनजागृती समिती, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन केंद्राच्या स्थापनेसाठी, तसेच सनातन संस्थेच्या शंखनाद कार्यक्रमासाठी त्यांनी अर्पण केले आहे. महाराष्ट्रातील विविध देवळांच्या जीर्णोद्धारासाठी साहाय्य करणे, तसेच ताम्हाणे-साखळोली येथे सनातन संस्थेच्या माध्यमातून सत्संगाचे आयोजन, अशा विविध आध्यात्मिक आणि धार्मिक उपक्रमांना ते प्रोत्साहन देत आहेत. याखेरीज ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना अंगीकारून ‘हे विश्वचि माझे घर’, असा व्यापक दृष्टीकोन ठेवून महानगराचा गौरव वाढवण्यासाठी कार्यरत असणार्या संस्था आणि संघटना यांना ते आपल्या क्षमतेनुसार गतीमान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या अंतर्गत भारतीय सण, परंपरा, उत्सव यांवर आधारित कार्यक्रम नाट्य, नृत्य, गायन, कथाकथन, रांगोळी, नववर्ष स्वागतयात्रा, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, दिवाळी, तसेच विज्ञाननिष्ठ, ऐतिहासिक आणि पर्यावरण आधारित उपक्रमांना ते वर्षानुवर्षे आर्थिक पाठबळ देत आहेत अन् स्वतःही त्यात सहभागी होतात.
|
उ. ‘राष्ट्राने उद्योजकीय पातळीवर प्रगती साधावी आणि नवउद्योजकांनी पुढे यावे, नोकरी मागणार्याऐवजी नोकरी देणारे बनावे’, ही त्यांची तळमळ नेहमीच दिसून येते. म्हणूनच ‘सॅटर्डे क्लब’, ‘उद्योग अनुभव प्रतिष्ठान’, ‘कर्हाडे ब्राह्मण बिझनेस फोरम’, ‘लघुउद्योग भारती’ अशा संस्थांशी ते सक्रीयपणे जोडले गेले आहेत. आज अनेक ब्राह्मण युवक पौरोहित्य, शेती, नोकरी सोडून उद्योजकतेकडे वळत आहेत, यामागे प्रेरणा म्हणूनही रवींद्रजींचे नाव घेतले जाते.
त्यांच्या राष्ट्रकार्यामागची भावना स्पष्ट करतांना रवींद्रजी म्हणतात, ‘‘देव, देश आणि धर्म यांपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. त्यामुळे ज्या संस्था किंवा आस्थापने धर्मप्रसार आणि राष्ट्रकार्यात कार्यरत असतात, त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे, हेच खरे धर्मकार्य आहे, ही माझी ठाम धारणा आहे.’’
२. पितांबरीचा प्रवास : स्वदेशीकडून आत्मनिर्भरतेकडे !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘स्वदेश’, ‘स्वभाषा’ आणि ‘स्वराज्य’ या ३ स्तंभावर ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. याच विचारांच्या आधारावर डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी ‘पितांबरी ब्रँड’ पूर्णतः स्वदेशी ठेवण्याचा संकल्प केला आहे. ‘पितांबरी’ची सर्व उत्पादने भारतीय ज्ञान, भारतीय लोकांचे सहकार्य आणि भारतियांसाठीच सिद्ध केली जातात. ‘पितांबरी’च्या स्थापनेपासूनच स्वदेशीचा भाव जपला आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याचे उत्तम उदाहरण, म्हणजे फुलांच्या नैसर्गिक अर्कापासून सिद्ध केलेली ‘देवभक्ती अगरबत्ती’. या अगरबत्तीसाठी लागणारी बांबूची काडी मात्र व्हिएतनाम आणि चीन येथून आयात करावी लागत होती. त्यामुळे निर्मितीचा व्यय वाढत होता. याखेरीज ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ होती. यावर उपाय शोधतांना ‘ईशान्य भारत हा बांबूच्या गवतश्रेणीतील वन आणि शेती उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे’, ही माहिती मिळाल्यावर डॉ. प्रभुदेसाई यांनी प्रारंभीला गौहत्तीजवळ (गुवाहाटीजवळ) जागा घेऊन तिथे बांबूची लागवड आणि त्यापासून ‘देवभक्ती अगरबत्ती’च्या काड्यांचे उत्पादन चालू केले. त्यामुळे आयातीवर व्यय होणारा निधी देशातच राहिला. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ताम्हाणे, तळवडे, तसेच दापोली तालुक्यातील साखळोली येथे मोठ्या प्रमाणात बांबू लागवड त्यांनी केली आहे. या काड्यांच्या निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामुग्रीही पूर्णपणे स्वदेशी आहे. अशा प्रकारे सुगंधाच्या निर्मितीपासून सिद्ध अगरबत्तीपर्यंत ‘पितांबरी’ आस्थापन संपूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ झाले आहे. या अगरबत्ती उद्योगाच्या माध्यमातून १०० हून अधिक कुटुंबांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
🔴पितांबरीची Success Story🔴Ravindra Prabhudesai🔴Pitambari Success Story🔴Pitambari
(सौजन्य : UNTOLD STORIES) |
३. ग्राहक स्वातंत्र्यासाठी ठाम पाऊल – ‘ओम्’ प्रमाणित उत्पादनांचा निर्धार !
राष्ट्रउभारणीच्या कार्यातील रवींद्रजींनी उचललेले दुसरे महत्वाचे पाऊल, म्हणजे ‘ओम्’ प्रमाणपत्राचे अवलंबन ! खाद्य पदार्थांपासून वस्त्र, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी सर्वच उत्पादनांकरता व्यावसायिकांना ‘हलाल’ प्रमाणपत्र (इस्लामनुसार जे वैध ते) घ्यावे लागते. हलाल प्रमाणित असलेली ही उत्पादने नाईलाजाने हिंदूंनाही घ्यावी लागतात. या हलाल सक्तीला विरोध करत रवींद्रजींनी नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू श्री. रणजीत सावरकर यांच्या समक्ष ‘ओम् प्रमाणपत्र’ स्वीकारून ‘पितांबरी’ची उत्पादने ‘ओम् प्रमाणित’ करण्याची ग्वाही दिली. हलाल सक्ती ही भारतीय राज्यघटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य आणि हिंदु ग्राहक अधिकार यांच्या विरोधात आहे. ही सक्ती झुगारून यापुढे ‘पितांबरी’ ‘ओम् प्रमाणित’ उत्पादनांच्या माध्यमातून ‘हिंदूपासून हिंदूपर्यंत’ हे धोरण यशस्वीपणे अवलंबणार आहे. ग्राहकहित जपणार्या या पुढाकारामुळे रवींद्रजींनी ‘ग्राहक देवो भव: ’ या आपल्या आणि ‘पितांबरी’च्या विचारसरणीला पुन्हा एकदा कृतीत उतरवले आहे.
आध्यात्मिक साधनेतून हिंदु संस्कृतीशी नाळ जोडणारी पितांबरीची कार्यसंस्कृती !

उद्योगातून मिळालेल्या धनाचा उपयोग राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि सांस्कृतिक कार्यासाठी करणे, तसेच समाजातील संस्थांना सढळ हस्ते साहाय्य करणे, हे सद्गुण त्यांच्यात वृद्धींगत झाले, याचे श्रेय रवींद्रजी आध्यात्मिक साधनेला देतात. तन, मन, धन अर्पण करून साधना आणि ‘जे काही आपले आहे, ते सर्व ईश्वराचेच आहे’, ही भावना मनात ठेवून अर्पण करण्याची वृत्ती त्यांनी जोपासली आहे.
‘भारत एक हिंदु राष्ट्र बनावे’ आणि अधिकाधिक लोकांनी ‘हिंदु’ या शब्दानुसार जीवनपद्धत स्वीकारली, तर समाजात सुख, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ‘प्रत्येक व्यक्ती साधना करणारी असेल आणि त्यातून ती खर्या अर्थाने सुखी होईल; मात्र हे हिंदु राष्ट्र घडवण्यासाठी आपणा सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील अन् हे प्रयत्न आध्यात्मिक साधनेतूनच शक्य होतील’, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. याच दिशेने एक पाऊल म्हणून ‘पितांबरीने ‘व्यवसाय वृद्धी के १२ अध्यात्मिक मंत्र ओर तंत्र’ या विषयावर आधारित विशेष ‘दैनंदिनी’ सिद्ध केली आहे, जेणेकरून प्रत्येकाला अध्यात्मातून व्यावसायिक प्रगती साधण्यासाठी मूलमंत्र मिळू शकेल आणि व्यक्ती या वैयक्तिक प्रगतीतून राष्ट्राचीही उन्नती साधू शकेल.
एवढेच नव्हे, तर ‘पितांबरी’ समुहात काम करणार्या प्रत्येक सहकार्याला आध्यात्मिक साधनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाने सहकार्यांसाठी सत्संग चालू केले. पितांबरी कार्यालयात दैनंदिन कामाचा प्रारंभ प्रतिदिन सकाळी प्रार्थना आणि नामस्मरण यांनी केला जातो. इतकेच नव्हे, तर ‘पितांबरी’च्या ग्राहकांनाही साधनेचे महत्त्व समजावे, यासाठी अगरबत्ती वा पूजासाहित्यासमवेत ‘साधना कशी करावी ?’, याचे माहितीपत्रक देण्यात येते. हिंदु संस्कृतीशी नाळ कायम जोडून ठेवण्यासाठी कार्यालयात प्रत्येक हिंदु सण साजरा केला जातो. अशा सणाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून आयोजित केले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यपद्धतीने डॉ. रवींद्रजी पुष्कळ प्रभावित आहेत. त्यामुळे स्वतःच्या आस्थापनात तीच पद्धत अवलंबण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘मॅनेजमेंट’चे (व्यवस्थापनाचे) अनुकरण आस्थापनात केले जाते.
नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग या सनातन धर्माच्या गुरुकिल्लीनुसार साधना केल्याने व्यवसायवृद्धीसाठी त्याचा कसा उपयोग होतो ?, तसेच प्रारब्धावर मात करून कशी प्रगती साधता येते ? याची अनुभूती त्यांनी स्वतः घेतली आहे. जशी सृष्टी पंचमहाभूतांवर (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश) आधारित आहे, त्याप्रमाणेच यशस्वी व्यवसायही ‘५-एम्स’वर (5 M’s) उभा असतो. या ५ तत्त्वांच्या ५ देवता असतात आणि त्यांमध्ये ‘कुलदेवते’चे नामस्मरण केल्यास सर्व देवता प्रसन्न होतात, त्याचप्रमाणे व्यवसायातील ‘५- एम्स’मध्ये योग्य समन्वय राखल्यास यश हे निश्चित मिळते.
उद्योगाच्या भाषेत हे ‘५- एम्स’ म्हणजे
अ. ‘मटेरियल’ (Material) (पृथ्वी) : उत्पादनासाठी आवश्यक असलेले मूळ साहित्य
आ. ‘मनी’ (Money) (आप) : भांडवल, जी प्रत्येक व्यवसायाची आर्थिक ऊर्जा असते
इ. ‘मॅनपॉवर’ (Manpower) (तेज) : कर्मचार्यांचे कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठा
ई. ‘मशीन’ (Machine) (वायू) : आधुनिक तंत्रज्ञान आणि पालटत्या काळानुसार प्रक्रिया
उ. ‘मार्केट’ (Market) (आकाश) : योग्य बाजारपेठेची निवड आणि विस्तार.
या ‘५- एम्स’चा योग्य समतोल राखून व्यवसायात नक्कीच यश मिळवता येते, ही अनुभूती त्यांनी घेतली आहे.
हा लाभ इतर उद्योजकांनाही व्हावा, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आध्यात्मिक साधनेतून व्यवसायवृद्धी’ या विषयावर ते व्यावसायिक आणि नवउद्योजक यांसाठी सत्संग घेत आहेत. राष्ट्रात चांगले उद्योजक घडावेत, या उद्देशाने त्यांनी आतापर्यंत गोव्यात म्हापसा, फोंडा, पणजी, तसेच कोकणातील कुडाळ, मालवण, रत्नागिरी आणि दापोली येथेही व्याख्याने घेतली आहेत. लवकरच डॉ. प्रभुदेसाई यांचे देवगड येथेही व्याख्यान होणार आहे. ‘हिंदुत्वाचे कट्टर समर्थक’ असलेले रवींद्रजी आता ‘डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई’ झाले आहेत. ‘कोकणात ३ सत्संग घेतल्यानंतर घरी परतल्यावर मला टिळक विद्यापिठातून ‘डी.लिट्.’ पदवी मिळणार आहे’, असे समजले आणि पुन्हा एकदा ‘गुरुकृपेने परमेश्वर आपल्या पाठीशी आहे’, अशी गाढ अनुभूती मिळाली’, असे डॉ. रवींद्रजी कृतज्ञतापूर्वक सांगतात.

४. ‘गो-संस्कृती ही राष्ट्राची ओळख’, तर गोमाता म्हणजे सनातन संस्थेचा अभिमान !
गोपालन, गोरक्षा, गो-उत्पादन हे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. नि:स्वार्थ सेवाभावाने गोमातांची सेवा आणि संरक्षण करण्यासाठी रवींद्रजी कटिबद्ध आहेत. त्याच आत्मीयतेतून आज विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत स्थापन झालेल्या ‘गोसेवा संवर्धन न्यासा’चे ते माननीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मराठवाड्यात काही वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा छावणी उभारण्याची निकड निर्माण झाली होती. त्या वेळी एका सामान्य गोसेवकाने त्यांना साहाय्यासाठी पत्र लिहिले. रवींद्रजींनी विलंब न लावता तातडीने आवश्यक रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करून साहाय्याचा हात पुढे केला. सनातन संस्थेच्या पनवेल आश्रमातील (कै.) परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांनी गायींची सेवा करण्यास प्रारंभ केला. गायींचे आध्यात्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व लक्षात आल्यानंतर आनगाव, तळवडे, दापोली येथे त्यांनी गोशाळा उभारल्या. यामध्ये एकूण ६८ गोधन त्यांच्याकडे आहे. याद्वारे गोसेवेचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडत आहे. गायीच्या शेणापासून ‘पितांबरी गोमय शेणखत’, विविध आजारांवर गुणकारी गोमूत्रापासून निर्मित ‘पितांबरी गोमूत्र प्लस कॅप्सूल’, रोगप्रतिकार शक्तीवर्धक ‘पितांबरी गोपीयुष टॅब्लेट्स’ यांसारख्या विविध उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आहे. गायीपासून मिळणार्या पंचगव्यापासून अन्य उत्पादनांच्या निर्मितीसह गोवंश संवर्धनाचेही मोठे कार्य ते करत आहेत. पुढील काळात देशी गायींवर सखोल संशोधन करण्याचा त्यांचा निर्धार आहे.