India Attacks Pakistan : ‘ऑपरेशन सिंदूर’ : भारताने पाकला घरात न घुसता धोपटले !

५० हून अधिक ड्रोन पाडले ३ लढाऊ विमाने पाडली  १० शहरातील सैनिकी तळांना केले लक्ष्य

कराची बंदरावरील नौदल तळ उद्ध्वस्त  पाकचे पंतप्रधान बंकरमध्ये लपले

नवी देहली – पाकिस्तानने ७ मेच्या रात्री भारताच्या १५ सैनिकी तळांना लक्ष्य करत डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांना भारताची हवाई संरक्षण प्रणाली ‘एस्-४००’ने हवेतच उद्ध्वस्त केले. तसेच ८ मेच्या सकाळी पाकच्या काही शहरातील त्याची ‘एच्क्यू-९’ ही हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली होती. यामुळे चवताळलेल्या पाकने ८ मेच्या रात्री ८ नंतर भारताच्या जम्मू, पंजाब आणि राजस्थान येथे ड्रोन, क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमाने यांद्वारे आक्रमण केले; मात्र याही वेळेस भारताच्या विविध हवाई संरक्षण प्रणालींद्वारे त्यांना हवेतच उद्ध्वस्त करण्यात आले. यात ५० हून अधिक ड्रोन, ८ हून अधिक क्षेपणास्त्रे, तसेच ३ लढाऊ विमाने पाडण्यात आली. यात अमेरिकी बनावटीचे एक लढाऊ विमान ‘एफ्-१६ आणि चिनी बनावटची २ ‘जेएफ्-१७’ ही लढाऊ विमाने यांचा समावेश आहे. पाकची ही आक्रमणे निकामी करण्यात आल्यानंतर भारताने प्रत्युत्तरात पाकमध्ये आक्रमण केले. भारताने सीमा न ओलांडताच ही आक्रमणे केली.

या कारवाईत ड्रोन विमानांचा आणि क्षेपणास्त्रे यांचा वापर करण्यात आला. याच वेळी भारताच्या नौदलाने कराची बंदरावर आक्रमण केले. भारताचे आक्रमण इतके मोठे होते की, यामुळे पाकचे कंबरडे मोडले. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सुरक्षित बंकरमध्ये जाऊन लपावे लागल्याचे सांगितले जात आहे. पाकने भारतावर केलेल्या आक्रमणात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारताने पाकवर केलेल्या आक्रमणात किती जीवित किंवा वित्त हानी झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही. दुसरीकडे पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या विरोधात सैन्यात बंड होऊन त्यांना पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

भारताची हवाई संरक्षण प्रणाली ‘एस्-४००’

पाकने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेली भारतीय ठिकाणे

  • जम्मू-काश्मीर : अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, सतवरी, सांबा, आर्.एस्. पुरा, अर्णिया
  • पंजाब : पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधयाना, आदमपूर, भटिंडा, चंडीगड
  • गुजरात : पालोडीया
  • राजस्थान : उत्तरलाई, भूज

भारताने आक्रमण केलेली पाकमधील शहरे

  • इस्लामाबाद
  • लाहोर
  • कराची
  • रावळपिंडी
  • मुझफ्फराबाद
  • सियालकोट
  • बहावलपूर

पाककडून भारताच्या सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न

पाकने जम्मू विमानतळ, तेथील वायूदलाचे तळ, तसेच पठाणकोट, जैसलमर येथील तळ यांना प्रामुख्याने लक्ष्य केले होते. जम्मूच्या सतवारी, सांबा, आर्. एस्. पुरा आणि अर्णिया या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. येथे ९ मेच्या सकाळीही पाककडून गोळीबार, मोर्टार यांचा मारा चालू होता. याला भारतीय सैन्याकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येत होते. यात पाक सैन्याच्या काही चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. पाककडून आक्रमण करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांतील सीमेवरील शहरांमध्ये ‘ब्लॅकआऊट’ करण्यात आले होते. भारताने हवेतच उद्ध्वस्त केलेल्या पाकच्या ड्रोन, क्षेपणास्त्रे यांचे अवशेष या राज्यांतील सीमेवरील भागांत पडले. सकाळी पोलीस आणि सैन्यदल यांच्याकडून ते कह्यात घेण्यात आले.

सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी करणारे ७ आतंकवादी ठार

जम्मूमधील सांबा सेक्टरमधून ८ मेच्या रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ७ आतंकवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाने ठार केले. या वेळी सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या सैन्याच्या सीमा चौकीची मोठी हानी केली. या चौकीतून आतंकवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी गोळीबार करण्यात येत होता.

  • (म्हणे) ‘आम्ही काहीच केले नाही !’ – पाकचा कांगावा

  • भारतीय सैन्याने पुरावा देत पाकला सुनावले !

भारतातावरील ड्रोन आक्रमणाची आमचा काहीही संबंध नाही, असा कांगावा पाकिस्तानने केल्यानंतर भारतीय सैन्याने ‘एक्स’वर पुरावे सादर करत पाकला सुनावले. या वेळी सैन्याने पाकचे ड्रोन हवेत उद्ध्वस्त करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला. सैन्याने म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकच्या ड्रोन आक्रमणांना भारताकडून यशस्वीरीत्या निष्प्रभ करण्यात आले असून शस्त्रसंधी उल्लंघनालाही सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि भौगौलिक एकतेचे संरक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य बांधील आहे. त्यावर आक्रमण करणार्‍या कोणत्याही आततायी कृतीला संपूर्ण शक्तीनिशी उत्तर दिले जाईल, अशी चेतावणीही भारतीय सैन्याने पाकला दिली.

कराचीवरील आक्रमणात विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’चा सहभाग

विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’

भारताच्या नौदलाने ८ मेच्या रात्री पाकची आर्थिक राजधानी असलेल्या कराची बंदरावर आक्रमण केले. यात कराची बंदराची मोठी हानी झाली, तसेच येथील पाकच्या नौदलाचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. १०० कि.मी. लांबूनच क्षेपणास्त्रे डागून ही कारवाई करण्यात आली. या आक्रमणात पाकच्या युद्ध साहित्याची मोठी हानी झाली. तसेच इंधन डेपोला आग लागली आणि मोठे स्फोट घडले. येथील संपर्क यंत्रणा नष्ट झाली. ज्यामुळे कराची आणि इस्लामाबाद या शहरांचा संपर्क तुटल्याची माहितीही पुढे आली आहे.