परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांचा इराणी परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत संदेश

नवी देहली – जर पाकिस्तानने भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईच्या संदर्भात कोणतीही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली, तर भारत गप्प बसणार नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारताच्या दौर्यावर असणारे इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांना स्पष्टपणे सांगितले आहे. इराणकडून पाकसाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले जात असतांना भारताने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. डॉ. जयशंकर यांनी असेही स्पष्ट केले की, ही परिस्थिती आणखी वाढवण्याचा आमचा हेतू नाही. एक शेजारी आणि जवळचा भागीदार, म्हणून परिस्थितीची चांगली समज असणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी चीनलाही सांगितले होते की, जर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले, तर भारत योग्य उत्तर देईल. जगाने आतंकवादाविरुद्ध शून्य सहनशीलता दाखवावी.
संपादकीय भूमिकाभारताने नेहमीच अशी भूमिका घेतली पाहिजे. इतकेच नाही, तर भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच त्यापूर्वीच भारत आक्रमण करील, अशी कृती भारताने करणे आता आवश्यक आहे ! |