तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील श्री. अर्जुन संपथ ‘हिंदु मक्कल कत्छी’ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून ते हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करतात. ते धर्मांतरित हिंदूंच्या शुद्धीकरण अभियानात सक्रीय आहेत. त्यांनी अयोध्येमध्ये प्रभु श्रीराममंदिराच्या निर्मितीसाठी कोईम्बतूरमध्ये आंदोलन केले. ते श्रीलंकेतील हिंदूंच्या मानवाधिकारासाठीही संघर्ष करत आहेत. त्यांना अमेरिका, कंबोडिया, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमध्ये आयोजित केलेल्या हिंदु महासभांमध्ये सहभागी होण्याचा सन्मानही प्राप्त झाला आहे. त्यांनी तमिळनाडूमध्ये आध्यात्मिक प्रशासन निर्माण होण्यासाठी समर्पित प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याला ‘सॅफ्रॉन लिडर’ (भगवा नेता) या नावाने न्यूयॉर्कमध्ये ‘हिंदुरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वर्ष २०१८ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. श्री. अर्जुन संपथ यांचे एक वैशिष्ट्य आहे की, ते गोवा येथे होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त अगदी प्रारंभीपासून, म्हणजे वर्ष २०१२ पासून २०२४ पर्यंत नियमितपणे सहभागी झाले आहेत. हिंदूसंघटन दृढ करण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न असतो.

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. परिचय
श्री. अर्जुन संपथ यांचा जन्म २० एप्रिल १९६५ या दिवशी झाला. ते कोईम्बतूर जिल्ह्यातील पोल्लाची तालुक्याजवळील परियकवंदनूर गावात वाढले. लहानपणी ते त्यांच्या वडिलांसमवेत पेरियार (नास्तिक आणि हिंदु धर्मविरोधी नेते) आणि के. कामराज यांच्या अनेक सभांना जात असत. त्यांचे वडील पेरियार यांचे अनुयायी होते. अशा कुटुंबात एक हिंदुत्वनिष्ठ नेता निर्माण होणे, हे आश्चर्यजनक आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे वर्ष १९८२ मध्ये त्यांना १२ वीनंतर शिक्षण सोडावे लागले. त्यांनी एका खासगी आस्थापनात ‘विक्री प्रतिनिधी’ म्हणून काम केले आणि नंतर त्यांचे वडील चालवत असलेल्या केशकर्तनालयात काम केले. त्या काळात त्यांनी त्यांच्या गावात ‘लिटिल फ्लॉवर वेल्फेअर सेंटर’ चालू केले, जे मुलांना शाळेनंतरचे शिक्षण, खेळ यांसारख्या बाह्य गोष्टींमध्ये साहाय्य करत असे. ते वादविवाद आणि स्पर्धा यांसारखे विविध उपक्रम आयोजित करत असत.
अर्जुन संपथ यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव

विरोधकांनी श्री. संपथ यांना ठार करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. वर्ष २०१६ मध्ये श्री. संपथ यांचे चारचाकी वाहन जाळण्यात आले होते. याविषयी अनुभूती सांगतांना श्री. संपथ म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मी कित्येक कठीण प्रसंगांतून बाहेर पडू शकलो आहे. एकदा काही आतंकवाद्यांनी माझ्या घरावर पेट्रोल बाँब फेकला होता. त्या वेळी केवळ सच्चिदानंद परब्रह्म यांच्या कृपेमुळेच आमचे प्राण वाचले. गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद यांमुळे मी हिंदुत्वाचे कार्य करू शकत आहे.’’
२. हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सहभाग

वर्ष १९८१ मध्ये तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील मीनाक्षीपुरम् येथे सहस्रो दलित हिंदूंनी इस्लाम पंथ स्वीकारला. त्या वेळी श्री. संपथ केवळ १६ वर्षांचे होते. तेव्हा त्यांना हिंदु अस्मितेचा अभाव जाणवला. या घटनेमुळे त्यांना हिंदु धर्माच्या उद्दिष्टांचे पालनपोषण आणि प्रचार करण्यासाठी समर्पित असलेल्या संघटनेचे महत्त्व लक्षात आले.
वर्ष १९८० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९९३ पर्यंत संघ परिवाराचे सदस्य म्हणून श्री. संपथ यांनी अनेक अखिल भारतीय चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी श्रीरामजन्मभूमी आंदोलन, हिंदु मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची चळवळ, धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेणे यांसारख्या अनेक चळवळीत सहभाग घेतला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कृपाशीर्वाद

जिहाद्यांकडून गेल्या १० वर्षांत तामिळनाडूमध्ये १२७ हिंदु नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. श्री. अर्जुन संपथ जिहाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर अग्रस्थानी असतांना आणि सतत जिहाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या येत असतांना एकांड्या शिलेदाराप्रमाणे तमिळनाडूतील जिहादी, नास्तिकवादी आणि धर्मांतरवादी यांच्या विरोधात लढा देत आहेत. आज हिंदु समाजासाठी ‘संघर्ष’ हाच आशेचा किरण आहे. श्री. अर्जुन संपथ हे वीरतापूर्वक तमिळनाडूमध्ये हिंदु समाजासाठी हा संघर्ष करत आहेत. अर्जुन संपथ यांच्यासारखे लढवय्ये वीरपुरुष केवळ तमिळनाडूमध्येच नाही, तर सर्वच राज्यांत जन्माला आले, तर भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही !
३. हिंदुविरोधी वातावरण असणार्या तमिळनाडूमध्ये धर्मरक्षणाचे कार्य
अ. तमिळनाडूत नेहमीच देश, धर्म आणि ब्राह्मण यांविरोधी राज्य सरकार सत्तेवर राहिले आहे. सध्या सत्ताधारी द्रमुकसारख्या द्रविडी पक्षाचे नेते सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करत आहेत. अशा राज्यात श्री. अर्जुन संपथ हे तमिळनाडूच्या हिंदुत्वनिष्ठ क्षेत्रात आघाडीचे नाव आहे. कन्याकुमारी येथील भारतमातेच्या पुतळ्याला झाकण्याचे प्रकरण असो किंवा हिंदूंच्या श्रद्धांवरील आघात असो इत्यादींच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. यासमवेतच चेन्नईतील श्री कपालेश्वर मंदिराच्या मूळ जागेवर बांधलेले सॅन्थोम चर्च असो, ‘झी टीव्ही’वरील ‘गॉडमन वेब सिरीज’चा वाद असो किंवा कोईम्बतूरमधील २ मंदिरांसमोर डुकराचे मांस फेकणे असो या सर्वांविरुद्ध ‘हिंदु मक्कल कत्छी’ने आवाज उठवला आहे.
आ. गोरक्षण : श्री. संपथ यांनी भारतात सर्वत्र गोमांस बंदी केली पाहिजे, यासाठी नेहमीच आवाज उठवला. चालू असलेल्या वर्षात राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याकडून गोमांस मेजवानींचे पेव फुटले होते. तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी डुकराचे मांस वाटण्याची चेतावणी दिली होती.
इ. हिंदूसंघटन : तमिळनाडूमध्ये काही राजकीय पक्ष आर्य-अनार्य वाद निर्माण करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा सतत प्रयत्न करत असतात. त्या विरोधात श्री. संपथ जनजागृती करतात. तमिळनाडूत ‘तमिळी आणि हिंदु वेगळे आहेत’, असा चुकीचा समज पसरवण्याचे षड्यंत्र चालू असते. त्या विरोधात श्री. संपथ हिंदूंना संघटित करण्याचे कार्य करतात. अशा हिंदुविरोधी वातावरणात श्री. संपथ धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. तमिळनाडूतीलच नव्हे, तर श्रीलंका, इंडोनेशिया, सिंगापूर आदी देशांतील हिंदूंना संकटकाळी श्री. अर्जुन संपथ यांचा आधार वाटतो.
ई. धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत घेण्याचा उपक्रम : तमिळनाडूमध्ये हिंदु लोकसंख्या न्यून होत असून मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. तमिळनाडूतील कन्याकुमारी आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य ख्रिस्ती असल्याने तेथे चर्चची सत्ता चालते. वर्ष २०१५ मध्ये त्यांच्या ‘हिंदु मक्कल कत्छी’ पक्षाने तमिळनाडूमध्ये प्रथम ‘घरवापसी अभियान’ (धर्मांतरितांना स्वधर्मात घेणे) राबवले. त्यात १८ दलितांनी ख्रिस्ती पंथातून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. आतापर्यंत त्यांनी ८ सहस्रांहून अधिक लोकांना ख्रिस्ती आणि इस्लाम या पंथांमधून हिंदु धर्मात परत आणले आहे.

श्री. संपथ यांच्या ‘हिंदु मक्कल कत्छी’ पक्षाने त्रिप्लिकेन मंदिरात १०८ जणांच्या घरवापसीचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम थांबवण्यासाठी तमिळनाडू सरकारने दबाव आणण्याचा वापर केला आणि अनेक इच्छुकांना बलपूर्वक परत पाठवले, तसेच पोलीस बंदोबस्त लावून श्री. संपथ यांना त्यांच्या चेन्नई येथील घरातच स्थानबद्ध केले. त्यानंतरही त्यांनी हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला.
३. ‘राष्ट्रीय एकता यात्रे’च्या तमिळनाडू विभागाचे नेतृत्व
डिसेंबर १९९१ ते जानेवारी १९९२ या कालावधीत कन्याकुमारी ते श्रीनगर ‘राष्ट्रीय एकता यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. या यात्रेच्या तमिळनाडू विभागाचे नेतृत्व श्री. संपथ यांनी केले होते.
४. श्रीलंकेतील तमिळ भाषिक हिंदूंवरील अत्याचारांना विरोध
‘श्रीलंकेतील तमिळ भाषिक लोक हिंदु आहेत. त्यांच्यावर होणारे अत्याचार हे केवळ तमिळ भाषिक लोकांवर होणारे अत्याचार म्हणून पाहिले जाऊ नयेत, तर त्यांना श्रीलंकेतील हिंदूंवर होणारे अत्याचार म्हणून पाहिले पाहिजे’, असे श्री. संपथ यांना नेहमीच वाटले. त्यांच्या ‘हिंदु मक्कल कत्छी’ पक्षाने या अत्याचारांना तीव्र विरोध केला.
५. बंगालच्या मुर्शिदाबादमधील हिंदूंवरील अत्याचारांना विरोध
बंगालमध्ये धर्मांधांकडून वक्फ विधेयक सुधारणा कायद्याविरुद्ध आंदोलन करण्याच्या नावाखाली बांगलादेशी धर्मांध घुसखोरांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यात ६ हिंदूंच्या हत्या केल्या, तसेच त्यांच्या मालमत्तेची लूट केली. या दंगलीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही दंगलखोरांना सहकार्य केले. या विरोधात केंद्रातील भाजप सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु मक्कल कत्छी’ने नुकतीच केली.
|
|
Arjun Sampath on the covering of Bharat Mata statue in Kanyakumari and how Hindus fought back
Arjun Sampath on the covering of Bharat Mata statue in Kanyakumari and how Hindus fought back. In what is becoming a routine affair, Christian Bishops run the district of Kanyakumari regardless of who is in power, he claims. Some of the diabolical methods of DMK also discussed. A must watch!
|
६. अर्जुन संपथ यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा धर्मकार्यावर सकारात्मक परिणाम
तमिळनाडूतील संत-महात्म्यांच्या आशीर्वादाने हिंदु धर्म आणि समाज यांच्यासाठी निःस्वार्थ कार्य करणारे शिवोपासक श्री. अर्जुन संपथ प्रतिदिन कपाळी भस्म धारण करतात. ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्माचरण करून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. व्यष्टी आणि समष्टी साधनेमुळे त्यांच्या वाणीत भाव अन् चैतन्य निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या अनुयायांवर होऊन तेही धर्मसेवा करण्यास उद्युक्त् होतात. श्री. संपथ हे गोवा येथील एका अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित होते. अधिवेशनानंतर त्यांनी साधनेला आरंभ करण्यासाठी ‘स्काईप’ (संगणकीय प्रणालीचा सत्संग) सत्संगाची मागणी केली. त्यानंतर पहिला ‘स्काईप सत्संग’ ‘हिंदु मक्कल कत्छी’च्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या कार्याला ईश्वराचे अधिष्ठान असल्याने त्यांना व्यापक स्तरावर ‘हिंदूसंघटन’ आणि ‘हिंदुजागृती’ यांचे कार्य करणे शक्य होत आहे.