CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप

भारतातील कथित असहिष्णुतेविषयी उपस्थित केले प्रश्न

सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ

नवी दिल्ली – लंडनमधील बर्कबेक विद्यापिठात भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय अर्थात् कृत्रिम बुद्धीमत्ता) आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ हा चर्चेचा विषय होता. त्या वेळी एका व्यक्तीने भारतात वाढत्या असहिष्णुतेविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तसेच काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी युवकांना कथितरित्या ‘झुरळ’ संबोधल्याविषयीही कार्यक्रमात प्रश्न विचारल्याने वाद निर्माण झाला. या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या गोंधळाचा लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने तीव्र निषेध केला. सरन्यायाधीश सूर्यकांत सध्या ब्रिटनच्या ६ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत, जिथे ते विविध कायदेशीर आणि तांत्रिक विषयांवर त्यांची मते मांडणार आहेत.

१. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने हस्तक्षेप करून प्रेक्षक विचारत असलेला प्रश्न थांबवला आणि स्पष्ट केले की, हे सूत्र ‘एआय आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ या नियोजित विषयापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.

२. भारतीय उच्चायुक्तालयाने सामाजिक माध्यमांवर अधिकृत निवेदन प्रसारित करून असे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले. उच्चायुक्तालयाने नमूद केले की, लोकशाही समाजात मताभेद असणे स्वाभाविक आहे.

३. उच्चायुक्तालयाने असेही म्हटले की, लोकशाहीत मतभेद असले, तरी ते नेहमीच सभ्य आणि आदरपूर्वक पद्धतीने व्यक्त केले जाणे आवश्यक आहे. प्रेक्षकांमधील सदस्यांकडून होणारे असे उद्धट वर्तन शिष्टाचाराविरुद्ध आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमध्ये भारतातील कथित असहिष्णुतेविषयी प्रश्न उपस्थित होतो; मात्र ब्रिटनमध्ये लव्ह जिहादच्या वाढत्या कारवाया आणि तेथील हिंदूंवर होणारी आक्रमणे, यांविषयी कुणी काहीच का बोलत नाही ? आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर जाणूनबुजून भारताची नाचक्की करण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे !