एकदा माता पार्वतीने शंकराला विचारले, ‘‘जशी ‘विष्णुसहस्रनामावली’ आहे, तसे श्रीरामाचे एखादे स्तोत्र नाही का ?’’ तेव्हा भगवान शंकराने तिला ‘रामरक्षास्तोत्रा’विषयी सांगितले. रामरक्षेची निर्मिती कशी झाली ? ते आपण जाणून घेऊया.
आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. ‘१०० कोटी श्लोक असलेले रामायण मिळवावे’, असे सर्वांना वाटू लागले. देव, मानव आणि दानव हे भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते मिळवण्यासाठी त्यांच्यात पुष्कळ वाद झाला. शेवटी शंकराने रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली, तरी एक श्लोक शेष रहात होता. हा श्लोक अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्यांचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले, ‘‘ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो.’’ त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले आणि ते स्वतः ध्यानासाठी बसले; पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना.
शंकराने ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली, याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार; म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही वेळाने कंटाळून एकामागून एक सगळे निघून गेले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांनी बराच वेळ वाट पाहिली. शेवटी ते निद्राधीन झाले. नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. त्यांनी आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन ‘रामरक्षा’ सांगितली.
काही काळाने ऋषींना जाग आली. जे स्वप्नात ऐकले, त्यावरून त्यांनी ‘रामरक्षे’ची निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते ‘बुधकौशिक’ ऋषि ! याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे.
आदिष्टवान् यथा स्वप्ने, रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः, प्रबुद्धो बुधकौशिकः ।।१५।।
अर्थ – ज्याप्रमाणे भगवान शंकराने रात्री स्वप्नात रामाच्या रक्षणाचा आदेश दिला होता, त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बुधकौशिक ऋषींनी तो लिहून ठेवला.
श्री शंकराच्या आरतीतील ‘शतकोटीचे बीज वाचे उच्चारी’ यातील शतकोटीचे बीज म्हणजे ‘राम’ ही ती दोन अक्षरे होत !
आपण ‘राम राम’ दोनदा का म्हणतो ?
र = बाराखडीतील २७ वा शब्द
आ = बाराखडीतील २ रा शब्द.
म = २५ वा शब्द
एकूण = ५४
राम + राम = ५४+५४ = १०८. आपण जपतो त्या माळेचे मणीही १०८ असतात. याचा अर्थ आपण एखाद्या व्यक्तीला जर दोनदा ‘राम-राम’ म्हटले, तर आपण एक माळ जप केला, असे होते.
रामरक्षा सिद्ध कशी करावी ?
प्रतिदिन ठराविक ठिकाणी किंवा ठराविक वेळी १२१ वेळा रामरक्षा म्हटल्याने ती सिद्ध होते. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात प्रतिदिन १३ वेळा किंवा आश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी ( शारदीय नवरात्रात) प्रतिदिन १३ वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते.
‘श्रीरामरक्षा’ स्तोत्राचे महत्त्व !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘श्रीरामरक्षा’ या शब्दाचा अर्थ ‘रक्षणकर्ता राम’ असा आहे. रामरक्षेतील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय आणि तारक आहे.’’
श्रीरामरक्षेच्या नित्यपठणाचे लाभ !
हात-पाय धुवून, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणावी. कुमारवयीन मुलांनी रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर योग्य संस्कार होतात. नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते. ती आपले सदासर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनीसुद्धा नित्य रामरक्षा म्हणावी. त्यापासून निश्चितच लाभ आहे.
कोणत्याही महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून शुक्ल नवमीपर्यंत हे अनुष्ठान केले जाते. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी ९ वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की, त्याच्या यम-नियमांचे पालन करणे येतेच ! याचा अनुभव आल्याविना रहात नाही.
रामरक्षेतील वैशिष्ट्यपूर्ण श्लोक आणि तो म्हटल्याने होणारा लाभ !
रामो राजमणिः सदा विजयते रामम् रमेशम् भजे ।
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।।
रामान्नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
या श्लोकात ‘राम’ या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत.
रामो = रामः (प्रथमा), रामम् (द्वितीया), रामेण (तृतीया), रामाय (चतुर्थी)
रामान्नास्ति = रामात् (पंचमी), रामस्य (षष्ठी), रामे (सप्तमी), भो राम (संबोधन). या श्लोकात ‘र’काराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हटल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.
रामरक्षास्तोत्राचे इतर लाभ
‘आपदामपहर्तारम्’ हा श्लोक १ लक्ष वेळा म्हटल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे. प्रत्येक अवयवाचा स्वतंत्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते, उदा. ‘कौसल्येयो दृशौ पातु:’ हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात.
– भारती चंद्रचूड, पुणे
रामरक्षा : आरोग्यरक्षक कवच
आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झालेला रुग्ण यांना रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का ? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे ?
शिरो मे राघवः पातु, भालन् दशरथात्मजः ।।४।।
कौसल्येयो दृशौ पातु, विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणम् पातु मखत्राता, मुखं सौमित्रिवत्सलः ।।५।।
जिह्वां विद्यानिधिः पातु, कण्ठम् भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुध पातु, भुजौ भग्नेशकार्मुकः ।।६।।
करौ सीतापतिः पातु, हृदयञ् जामदग्न्यजित् ।
मध्यम् पातु खरध्वंसी, नाभिञ् जाम्बवदाश्रयः ।।७।।
सुग्रीवेशः कटी पातु, सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु, रक्षःकुलविनाशकृत् ।।८।।
जानुनी सेतुकृत् पातु, जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः, पातु रामोऽखिलं वपुः ।।९।।
असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे. थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे होय !
कवचाची फलश्रुती !
पातालभूतलव्योम, चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते, रक्षितम् रामनामभिः ।।११।।
अर्थ – पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर करूनही पाहू शकत नाहीत.
– भारती चंद्रचूड, पुणे
श्रीरामनामाचा लक्ष्मण, हनुमान, भरत शत्रुघ्न आणि सीता यांच्याशी असलेला संबंध !
रामनाम घेतांना लक्ष नामावर स्थिर झाले की, लक्ष+मन = लक्ष्मण होते. नामस्मरण करतांना मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की, भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात. शत्रूंचे हे मन हनन करते; म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते. शीतलता प्राप्त करते, म्हणजेच सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कुणाचा विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होते.
– भारती चंद्रचूड, पुणे